नागपूर : हिंदू धर्म हा सर्वसमावेश, सहिष्णू आणि सर्वांना सामावून घेण्याची ताकद ठेवतो. ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ इंग्रजी शब्दकोषात धर्मनिरपेक्ष असला तरी त्याचा खरा अर्थ सर्वधर्मसमभाव असा आहे. सर्वधर्मसमभाव हीच हिंदुत्वाची आधारशिला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.हिंदू रिसर्च फाऊंडेशन आणि मैत्री परिवार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्याहस्ते ‘सीएसआयआर’चे माजी महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना नागार्जुना ॲवार्ड तर पद्मभूषण एस. नंबीनारायणन यांना आचार्य भारद्वाज पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. आयटी पार्क येथील कवी कुलगुरू कालिदास सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला संस्कृत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना, वर्ल्ड हिंदू काँग्रेसचे स्वामी विद्यानंद, इस्त्राेचे डॉ. अरुणण उपस्थित होते.गडकरी म्हणाले की, आमचे आयुर्वेद, योगविज्ञान खूप प्रसिद्ध आहे. याची महती देशात नाही तर विदेशात गेल्यावर कळते. हिंदू जीवनपद्धतीचे आजच्या काळात योग्य सादरीकरण करण्यास आम्ही कमी पडतो. आणि याच कारणामुळे आमचे सारे काही सत्य असूनही आम्ही त्याला शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकलो नाही, अशी खंतही गडकरी व्यक्त केली. हिंदूत्व, हिंदू तत्त्वज्ञान, जीवनदर्शन हा आयुष्याचा मार्ग आहे, असे सर्वाेच्च न्यायालयानेही म्हटले आहे.

हेही वाचा : नागपूर : अंबाझरी तलावात बुडून मुलाचा मृत्यू ; दहा महिन्यातील बारावा बळी

त्यामुळे मूल्याधिष्ठित जीवनपद्धती ही आमची ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहिले आहे. सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असून या अमृत काळात तंत्रज्ञान, नवसंशोधन, विज्ञान हे खूप महत्त्वाचे आहे. मात्र, त्याच्यावरच सर्वस्व अवलंबून चालणार नाही. यासोबत इतिहास, संस्कृती, मूल्याधिष्ठित जीवनपद्धती आणि संस्कार या सर्वांना एक करून तयार होणारे तत्त्वज्ञानच आम्हाला विश्वगुरू बनवू शकेल. स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते की, अठरावे शतक हे मोगलांचे होते. एकोणविसावे शतक इंग्रजांचे होते.

हेही वाचा : विश्लेषण: मॅनइटर्स ऑफ… विदर्भ! विदर्भातील नरभक्षी वाघांच्या समस्येला जबाबदार कोण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विसाव्या शतकात अमेरिका ‘सुपर पॉवर’ म्हणून समोर आली. मात्र, एकविसावे शतक हे भारताचे असेल. तो दिवस दूर नसून स्वामी विवेकानंदाचे स्वप्न पूर्ण होईल, असेही गडकरी म्हणाले. यावेळी डॉ. माशेलकर यांनी मार्गदर्शन करताना आपल्या जीवनप्रवासाची माहिती दिली. एस. नंबीनारायणन यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. हिंदू रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. टी.बी. भाल यांनी प्रास्ताविकातून संस्थेची माहिती दिली.