बुलढाणा : ‘तोंडात भवानी, पोटात बेईमानी’, अशा प्रवृत्तींना पराभूत करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी येथे केले. उबाठा म्हणजे ‘बाप एक नंबरी, तो बेटा दस नंबरी,’ असे चित्र असल्याची जहाल टीका त्यांनी थेट उद्धव ठाकरेंचा नामोल्लेख न करता केली. खामगाव येथील मेहता हायस्कूलच्या मैदानावर महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आज रात्री साडेआठ वाजता सभा पार पडली. याप्रसंगी उमेदवार प्रतापराव जाधव, निलम गोऱ्हे, आमदार राजेंद्र शिंगणे, आकाश फुंडकर, संजय कुटे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी ठाकरे पितापुत्रावर टीकेची झोड उठविली. मी डॉक्टर नसताना अनेक ऑपरेशन केलीत. त्यांचा (मानेचा) पट्टा गेला, मात्र पाठीचा कणा वाकडाच राहिला. कालपरवा ठाकरे मला ‘नीच’ म्हणाले. मी मुख्यमंत्री झालो, कामे करतो म्हणून त्यांचा जळफळाट झाला, त्यांना ते असह्य होते. मात्र, मी शेतकरीपुत्र आहे, त्यामुळे माझा अपमान हा तमाम शेतकऱ्यांचा अपमान आहे, मी ज्या समाजाचा आहे, त्या समाजाचा घोर अपमान आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >>> “संविधान बदलणार नाही,” अमित शाह यांचा पुनरुच्चार; म्हणाले, “एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण”

वाघाचे कातडे घालून वाघ होता येत नाही. जनतेला असली व नकली वाघ बरोबर कळतो, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला. २०१९ मध्ये त्यांनी युतीशी बेईमानी केली, बाळासाहेबांच्या तत्त्वांशी आणि युतीला बहुमत देणाऱ्या जनतेशी, मतदारांशी बेईमानी केली. खरे गद्दार ते असून आम्ही बाळासाहेब यांच्या विचारांचे वारसदार असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. मोदींची दहा वर्षे म्हणजे भारताचा सुवर्ण काळ असल्याचे त्यांनी सांगितले. या दहा वर्षांची काँग्रेसच्या साठ वर्षांच्या राजवटीशी तुलना केली तर ती हिमालय विरुद्ध छोटी टेकडी अशी ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा >>> “देशभरात सत्तेचा गैरवापर सुरू, अशा पद्धतीची दडपशाही…” आमदार यशोमती ठाकूर यांचा भाजपवर आरोप

ही तर मोदी विरुद्ध २६ पक्ष अशी लढाई – फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीला लक्ष्य केले.  यंदाची निवडणूक देशासाठी निर्णायक असल्याचे सांगून देशाचा विकास, पुढील दिशा ठरविणारी निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध ‘इंडिया’चे २६ पक्ष, अशी लढत आहे. मात्र युतीचे इंजिन मोदींसारखे मजबूत आहे, एकाच व विकासाच्या दिशेने नेणारे आहे. त्याला अनेक पक्षांच्या बोग्या आहेत. याउलट ‘इंडिया’ची स्थिती आहे, त्यांच्याकडे इंजिनच इंजिन आहेत, बोग्याच नाही, अशी विचित्र गत आहे. ममता बॅनर्जी हे इंजिन बंगालकडे, उद्धव ठाकरे मुंबईकडे, शरद पवार बारामतीकडे, स्टालिन चेन्नईकडे हे इंजिन ओढतात. यामुळे ते इंजिन हलत नाही की चालत नाही, अशी खिल्ली त्यांनी उडविली. विरोधकाकडे काहीच मुद्दे नसल्याने ते काहीही बरगळत आहेत. मोदींनी चारशे पार केले तर म्हणे संविधान बदलणार, मात्र तसे काही नसून चंद्र-सूर्य असेपर्यंत संविधान बदलणार नाही, ही मोदींची ‘गॅरंटी’ असल्याचे फडणवीस यांनी निक्षून सांगितले.