वर्धा : वर्धेची जागा काँग्रेसनेच लढावी म्हणून शेवटच्या टप्प्यात प्रयत्न झाले. मात्र आता ही जागा राष्ट्रवादी पवार गटाकडेच जाणार यावर अखेरचे शिक्कामोर्तब झाले आहे. उमेदवारीसाठी सुरवातीपासून प्रयत्न करणारे काँग्रेसच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय समान्वयक शैलेश अग्रवाल हे आज दिल्लीत शेवटचा प्रयत्न म्हणून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटले.

हेही वाचा >>> वस्तीगृहात २४० निवासी विद्यार्थी दाखवा अन लाखाचे बक्षीस मिळवा; उपोषणकर्त्यांचे थेट संचालकांनाच आव्हान…

बंद द्वार चर्चेत नाना पटोले, बाळासाहेब थोरात व प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला  हे उपस्थित होते. त्यावेळी खर्गे यांनी वर्धेच्या जागेचे काय झाले, असा प्रश्न केला. सर्व मौन दिसून आल्यावर चेन्नीथला  म्हणाले की ‘ नन ऑफ युअर ( महाराष्ट्राचे ) लीडर इंट्रूपटेड इन वर्धा सीट ‘ असे बोलून गेले. महाराष्ट्रातील एकाही नेत्याने वर्धेबाबत स्वारस्य दाखविले नाही, असा अर्थ. त्यावर वर्धेची जागा बाळासाहेब यांचे जावई ( अमर काळे ) लढण्यास तयार आहेत. मी नाही तर त्यांना जागा मिळवून द्या, अशी भूमिका अग्रवाल यांनी मांडली. मात्र कोणीच काही बोलले नसल्याचे ते म्हणाले.  राष्ट्रवादी शरद पवार तर्फे लढतो काय, असे खर्गे यांनी विचारल्यावर अग्रवाल यांनी ते नाकारले.  प्रदेश नेते छाननी समितीचा अहवाल घेऊन खर्गे यांच्याकडे आले होते. त्यावेळी ही चर्चा झाली. दुपारी चार वाजता सी डब्लू सी ची बैठक आहे. त्यात उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार.