नागपूर : लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले यांना आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या सत्तेची किल्ली विदर्भातील नेतृत्वाकडे येणार आहे, असा विश्वास काँग्रेस नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी केले.

इंडिया आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ ताजबाग, रघुजीनगर येथे जनसभा गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, चंद्रकांत हांडोरे, अभिजीत वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख, शेखर सावरबांधे, दीनानाथ पडोळे, अशोक धवड, गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, अतुल लोंढे, संजय महाकाळकर, किशोर कुमेरिया, दुनेश्वर पेठे, प्रशांत धवड, वजाहत मिर्झा यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा…केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हरले तर सर्वात जास्त दुःख नाना पटोले यांना…, वंचितचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांचा टोला

पटोले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि त्यांच्या माध्यमातून सत्तेची किल्ली विदर्भात येईल असा दावाही त्यांनी केला. नाना पटोले यांच्या रुपात विदर्भाला एक नेतृत्व मिळाले आहे. ते महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहेत. ते महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत. जर लोकसभेत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसला विजय मिळाल्यास विदर्भाच्या हातात संपूर्ण महाराष्ट्राच्या नेतृत्व येणार आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा…अकोल्यात तिरंगी लढतीचा फायदा कोणाला ?

जनता अहंकारी मोदी सरकारचा करणार पायउतार

केंद्रातील भाजप सरकार अहंकारी झाल असून मनमानी कारभार करीत आहे. त्याचा जनसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन आभासी भौतिक विकासाचे चित्र रंगविण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे, जनतेला हे समजले असून आता अहंकारी सरकारचे पायउतार केल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा निर्धार उत्तर नागपुरातील जनतेने केला आहे, असे विकास ठाकरे म्हणाले.