नागपूर : सांगलीच्या जागेवरुन संजय राऊत जी काही वक्तव्य करत आहे, त्यांनी नाटके बंद करावी. काय बोलावे याच्या मर्यादा असल्या पाहिजे. एका छोट्या कार्यकर्त्यासारखे वक्तव्य करू नये, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. नाना पटोले नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. देशात सध्या संविधान विरोधी सरकार आहे, त्यासाठी आम्ही सर्वाना एकत्र येण्याची गरज असताना संजय राऊतांनी मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्यांनी एका छोट्या कार्यकर्त्यासारखे वागू नये. समोपचाराने सर्व प्रश्न सोडवले जातात. त्यामुळे त्यांनी सांभाळून बोलले पाहिजे, असा सल्ला नाना पटोले यांनी संजय राऊत यांना दिला.

रामटेक मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हे डमी आहेत. नागपुरचे उमेदवार मत मागणार नाही म्हणाले होते आणि आता गल्लोगल्ली फिरत आहे, भाजपची विक्षिप्त मानसिकता जनता ओळखून आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा जनता दाखवेल असेही, पटोले म्हणाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले तर जुनी पेन्शन लागू करू, केंद्रातील निवडणूक असल्याने ते जाहीरनाम्यात नाही असेही पटोले म्हणाले.

हेही वाचा…“काम बरोबर नाही, आत्ताच सावध व्हा,” चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणाला दिला इशारा; वाचा…

प्रकाश आंबेडकर यांच्याशी आम्ही आजही चर्चा करायला तयार आहे. आज नामांकन अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. मात्र आमचा अजूनही मैत्रीपूर्ण हात आहे. आम्ही प्रस्ताव दिला आहे त्यांनी निर्णय घ्यावा असेही पटोले म्हणाले. एकनाथ खडसे यांनी अमित शहा यांची भेट घेतली असली तरी मला वाटत नाही ते भाजपमध्ये जातील. ते स्वाभिमानी नेते आहे, भाजपने त्यांनी अतिशय वाईट वागणूक दिली आहे. भाजपकडे बलाढय स्वयंघोषित विश्व गुरू आहे,मग याला घ्या त्याला घ्या असे त्यांना का करावे लागत आहे. दुसऱ्या पक्षातील नेते आपल्या पक्षात घेऊन भाजपचे पक्षसंघटन वाढविणे सुरू असल्याची टीका पटोले यांनी केली.