लोकसत्ता टीम

नागपूर: भारताच्या भक्ती आंदोलनात आजही देशाला एक करण्याची शक्ती आहे. परंतु, देशाला डाव्या विचारांच्या बुद्धिवाद्यांपासून वाचवावे लागेल. अन्यथा हे लोक दक्षिण भारतीय संतांचे उत्तर भारतीय संतांसोबत आणि दलितांचे सवर्णांसोबत भांडण लावण्यात मागे पडणार नाहीत, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सदस्य सुरेश सोनी यांनी दिला.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आणि हिंदू धर्म संस्कृती मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, विचारवंत मा. गो. वैद्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. चिटणवीस सेंटरमध्ये झालेल्या या व्याख्यानमालेत ‘हिन्दू जीवन दर्शनाची सर्वसमावेशकता’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना सोनी बोलत होते. यावेळी कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी, हिंदू धर्म संस्कृती मंदिरचे अध्यक्ष मनोज वाघ उपस्थित होते. यावेळी विश्वविद्यालयाच्या ‘वैदर्भी’ या त्रैमासिकाच्या २४ व्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

आणखी वाचा- ‘हिंदूंच्या विकासासाठी हनुमान चालीसा विकास यंत्रणा!’ प्रवीण तोगडिया म्हणाले…

सुरेश सोनी पुढे म्हणाले, प्रसिद्ध मार्क्सवादी नेता रामविलास शर्मा हे जीवनाच्या शेवटच्या काळात वेदांच्या अभ्यासाकडे वळले. त्यांनी केलेल्या विश्लेषणानुसार, भारतावर अनेक वर्षे मुस्लिमांचे आक्रमण झाले असले तरी येथील एकतेला भक्ती आंदोलनाने वाचवले. संपूर्ण भारताला त्यांनी एका सूत्रांत बांधले. या देशात दोन हजार वर्षात अनेक विचारांची बिजे पेरली गेली. मुस्लीम, ख्रिश्चन, डावे आदींचा यामध्ये समावेश होता. मात्र, त्यांच्या फळाचे विश्लेषण केले तर यांनी सभ्यता, संस्कृती, ज्ञानाचा नाश केला. सगळ्यांना आपल्यासारखे करण्याची त्यांची प्रवृत्ती घातक होती. तर दुसरीकडे हिंदू विचारांच्या परिणामांचा विचार केला तर त्यांनी कधीही इतर धर्मीयांना आपल्यासारखे करण्याचे प्रयत्न न करता प्रत्येकाला स्वातंत्र देऊन जगण्याचा अधिकार दिला, असेही सोनी म्हणाले.

यावेळी त्यांनी मा.गो. वैद्य यांच्या जीवनावरही प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषण कुलगुरू त्रिपाठी यांनी केले. संचालन कार्यक्रमाचे समन्वयक डाॅ. सुमित कठाळे यांनी तर आभार राजेश दामले यांनी मानले.