नागपूर : मुंबईसह राज्यातील काही भागात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. या आजारामुळे काही मृत्यूही नोंदवले गेले आहेत. परंतु प्रत्यक्षात यावेळी करोनाचा प्रभाव ‘फ्लू’सदृशच आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. गंभीर आजार असलेल्या रुग्णांनी मात्र काळजी घेण्याची गरज आहे, असे मत राज्यातील कोविड टास्क फोर्सचे माजी सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.

हाॅटेल सेंटर पाॅईंट येथे शुक्रवारी ‘हॅलो डायबेटिज ॲकेडमिया’चा शुभारंभ झाला. या परिषदेसाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. शशांक जोशी म्हणाले, सध्या आढळणारे करोनाचे रुग्ण हे ओमायक्राॅन व त्याच्या उपप्रकाराशी संबंधित आहेत. या पद्धतीचे रुग्ण येत्या काळात सर्दी, खोकल्याच्या रुग्णाप्रमाणे नोंदवले जाणार आहेत. परंतु या रुग्णांनी वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे. आजाराचे निदान झाल्यास रुग्णाने स्वत: मुखपट्टी लावून चार दिवस आराम करायला हवा. अवयव प्रत्यारोपण केलेल्या अथवा गंभीर आजार असलेल्या रुग्णांनी मात्र हा आजार झाल्यास विशेष काळजी घ्यायला हवी. करण या रुग्णांची प्रतिकारशक्ती खूप कमी असते. त्यामुळे या रुग्णांना साधा ‘फ्लू’ झाला तरी त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले.

हवामान बदलामुळे रुग्णवाढ

देशात वर्षाला दोन सिझन ‘फ्लू’चे असतात. या काळात वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप येतो. सध्या उन व पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळेच ‘फ्लू’ सोबतच करोनाचे रुग्ण वाढलेले दिसत आहेत. हे रुग्ण येत्या काळातही दिसणार आहेत. परंतु जास्त घाबरण्याची गरज नाही. करोनाचा प्रभाव पूर्वी सारखा नाही. करोना काळात देशभरातील आरोग्य यंत्रणा सक्षम झाली. कोणत्याही स्थितीला आपण आता सामोरे जाऊ शकतो, असेही जोशी यांनी स्पष्ट केले.

मधुमेह व लठ्ठपणावर नियंत्रण शक्य

पोटातील चरबी, शरीर, लठ्ठपणामुळे २०० हून जास्त आजार होतात. पश्चिमात्य देशाच्या तुलनेत भारतात मधुमेहाचे रुग्ण जास्त वेगाने वाढत आहेत. त्यामुळेच भारतात रक्तदाब, ह्रदयविकारासह इतरही अनेक गंभीर आजार वाढत आहेत. भारतात पुरुषांच्या पोटाचा घेर ९० सेंटीमिटर तर महिलांच्या पोटाचा घेर ८० सेंटीमिटरहून जास्त असल्यास त्यांना मधूमेह, रक्तदाबाचा धोका वाढतो. त्यामुळे यांनी वेळीच सजग होण्याची गरज आहे. त्यासाठी आहार, नियमित व्यायाम, वाईट सवयी सोडायला हव्यात, असा सल्लाही डॉ. जोशी यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘स्क्रिन टाईम’ कमी करा- डॉ. सुनील गुप्ता

करोनानंतरच्या विविध अभ्यासानुसार मोबाईल, टीव्ही, लॅपटाॅपवर नागरिकांचा स्क्रिन टाईम सुमारे एक ते दीड तासांनी वाढला आहे. त्यामुळे सामान्यांची झोप ६ ते ८ तासांवरून आणखी कमी झाली आहे. यामुळे मधुमेहासह इतरही आजाराचा धोका वाढतो. तो टाळण्यासाठी या वाईट सवयी सोडण्याची गरज असल्याचे मधुमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी सांगितले.