गडचिरोली : राज्यात शिक्षक आणि शिक्षकेतर भरती घोटाळा समोर आल्यानंतर नागपूर शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह काही जणांना पोलिसांनी अटक केली. शिक्षक भरतीवर बंदी असतानाही बनावट कागदपत्राद्वारे बोगस नियुक्त्या देण्यात आल्या. त्यानंतर आता अल्पख्यांक शाळांच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करण्यात येत असून या शाळांमध्ये परिचरसाठी २५ लाख, प्रयोगशाळा सहाय्यक ३५ लाख आणि शिक्षकासाठी ४५ लाख दर असल्याची चर्चा आहे.

२०१२ नंतर शिक्षक भरती बंद करण्यात आली. त्यानंतर गडचिरोलीसह राज्यभरात अल्पसंख्यांक शाळांची संख्या झपाट्याने वाढली. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात ही संख्या ५० हून अधिक आहे. आदिवासी समाजात शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे उद्देश ठेऊन अनेक संस्थाचालकांनी गडचिरोलीत खाजगी अनुदानित शाळा सुरु केल्या. शासनाकडून मोठे अनुदान पदरात पाडून घेतले. मात्र, पैश्यांच्या हव्यासापोटी मोठं मोठ्या रकमा घेऊन भरती सुरु केली. सरकारने बंदी घातल्या नंतरदेखील उल्हास नरड सारख्या अधिकाऱ्यांना हाताशी घेत बोगस भरती केली. हा घोटाळा उघड झाल्यानंतर अल्पसंख्यांक शाळांचा गोरखधंदा चर्चेत आला आहे. विश्वस्थ मंडळात नियमबाह्यपणे अल्पसंख्यांक सदस्यांची नोंदणी करून अनेक संस्थाचालकांनी शाळांना अल्पसंख्यांक दर्जा मिळवून घेतला. या शाळांना राज्य शिक्षण संस्थांचा कायदा लागू होत नसल्याने येथे भरतीत आरक्षणही लागू होत नाही. याचाच फायदा घेत संस्थाचालकांनी लाखो रुपये घेऊन भरती सुरु केली आहे. यतीलच एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर भरतीचा दर सांगितला आहे. त्यानुसार परिचर २५, प्रयोगशाळा सहाय्यक ३५, शिक्षकासाठी ४५ लाख दर ठरवण्यात आला आहे. काही महिन्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील एका अल्पसंख्यांक शाळेने ३० पदे भरली. यातही बेरोजगार युवकांकडून लाखो रुपये उकळल्या गेले. काही संस्था पुन्हा भरती घेण्याच्या तयारीत असल्याचे कळते. त्यासाठी या संस्थाचालकांनी नरड यांच्यामार्फत अवैध परवानग्या मिळवून घेतल्याची माहिती आहे. या शाळांमध्ये झालेल्या भरतीत देखील १०० हून अधिक कोटींचा घोटाळा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याही भरतीची चौकशी करण्यात यावी, ही मागणी जोर धरत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपत्ती डोळे दीपवणारी

मागील १० वर्षात येथील संस्थाचालकांच्या संपत्तीत झालेली वाढ डोळे दीपवणारी आहे. या घोटाळ्याशी संबंधित अधिकाऱ्यांचीही संपत्ती कोट्यवधींच्या घरात असल्याची चर्चा आहे. यातील एका अधिकाऱ्याचे चंद्रपूर जिल्ह्यात आलिशान फार्महाउस, काटली, नगरी गावाजवळ शेकडो एकर शेत जमीन आणि संस्थाचालकांसोबत भागीदारीत कोट्यावधीचे भूखंड सध्या गडचिरोलीत चर्चेचा विषय ठरत आहे. शिक्षक घोटाळा उजेडात आल्यानंतर आपल्यावर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार या भीतीने गडचिरोलीतील शिक्षण ‘माफिया’ धास्तावले आहे. यासंदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लवकरच यांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.