अकोला : मध्य रेल्वेच्या भुसावळ-नागपूर मार्गावर पहिली संपूर्ण एसी डिलक्स एक्सप्रेस धावली ती ज्ञानेश्वरी सुपर एक्सप्रेस. मुंबई ते कोलकत्तादरम्यान धावणाऱ्या या गाडीला सुरू होऊन नुकतेच २५ वर्षे पूर्ण झालेत. पहिली एसी डिलक्स म्हणून प्रवाशांना सुरुवातीला या गाडीचे विशेष आकर्षण होते. या गाडीने भीषण काळ रात्रीचादेखील सामना केला. गेल्या अडीच दशकांपासून ही रेल्वेगाडी प्रवाशांच्या सेवेत अविरत धावत आहे.

भुसावळ- नागपूर मध्य रेल्वे मार्गावर १७ ऑगस्ट १९९८ रोजी पहिली एसी डिलक्स रेल्वे धावली. ज्ञानेश्वरी सुपर डिलक्स एक्सप्रेस ही पहिली एसी डिलक्स रेल्वेगाडी मुंबई आणि कोलकाता या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ज्ञानेश्वरी सुपर डिलक्स एक्स्प्रेसमध्ये केवळ ‘एसी क्लास’चे डब्बे होते. त्यावेळी प्रवाशांना याचे विशेष आकर्षण होते. त्यामुळे लोक या गाडीला बघण्यासाठी रेल्वेस्थानकावर गर्दी करीत होते. कालांतराने या गाडीमध्ये इतरही ‘क्लासचे’ डब्बे जोडण्यात आले. आठवड्यातून चार दिवस धावणारी ही रेल्वेगाडी एलटीडी ते शालिमारदरम्यान १९४२ किमीचे अंतर ३० तासांत पूर्ण करते. या गाडीला अकोल्यासह १७ थांबे आहेत. सध्या रेल्वेची रचना दोन सर्वसामान्य, आठ शयनयान व नऊ वातानुकूलित डब्ब्यांची आहे, अशी माहिती रेल्वे प्रवासी संघाचे ॲड. अमोल इंगळे यांनी दिली.

हेही वाचा – “ना कबुतर आया, ना फोन…”, ॲड. प्रकाश आंबेडकर असे का म्हणाले?

नक्सलवादी हल्ल्याची ती काळ रात्र

२८ मे २०१० रोजी पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात रात्री ज्ञानेश्वरी एक्सप्रेस रुळावरून घसरली. नक्षलवाद्यांनी १८ इंच लांबीचा रेल्वे रुळ काढून टाकला होता. तेव्हा ज्ञानेश्वरी सुपर डिलक्स एक्सप्रेस हावडा ते मुंबई असा प्रवास करत होती. त्यानंतर रुळावरून घसरलेल्या गाडीला विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मालगाडीने धडक दिली. या भीषण अपघातात किमान १४८ लोकांचा मृत्यू झाला आणि १८० हून अधिक लोक जखमी झाले होते. हा अपघात आहे की बॉम्बस्फोटामुळे झाला याबाबत सुरुवातीला अनिश्चितता होती. चालकाने स्फोटाचा आवाज ऐकला होता. सुरक्षा यंत्रणेमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती, अशी आठवणदेखील ॲड. अमोल इंगळे यांनी सांगितली.

हेही वाचा – वाशिम : जीर्ण, मोडकळीस आलेल्या इमारती, अपुरे शिक्षक; जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण की शिक्षा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातानंतर या मार्गावर कित्येक महिने रात्रीच्यावेळी रेल्वे चालवण्यात आल्या नव्हत्या. टाटानगर, खरगपूर, चर्क्रधरपूर या स्थानकावर मेल, आजाद, पोरबंदर, ज्ञानेश्वरी एक्सप्रेस रेल्वे रात्रीच्या वेळी थांबवण्यात येत होत्या. अप-डाऊन दोन्ही मार्गावरील वेळापत्रक विस्कळीत झाले होते. त्यावेळी प्रवाशांना मुंबई, पुणेसाठी विदर्भ, अमरावती, महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करावा लागत होता, असे ॲड. अमोल इंगळे म्हणाले. २५ वर्षांपासून धावणारी ज्ञानेश्वरी एक्स्रप्रेस मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशीप्रिय व भरभरून प्रतिसाद लाभणारी गाडी ठरली आहे.