नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. २ ऑक्टोबरला संघाचा विजयादशमी सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, नागपूरद्वारे नव्या संगीताचा साज चढलेल्या संघगीत संग्रहाचे लोकार्पण सोहळा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते रविवारी पार पडला. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी संघाची अनेक गाणी गायली आहेत. त्यांच्या गाण्यांनी संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संघ गीतांची निर्मितीची कल्पना कुठे सुचली, ते कसे तयार करण्यात आले याबद्दल माहिती दिली. शंकर महादेवन यांच्या आवाजातील स्वरबद्ध केलेली गाणी ऐकून गडकरींनी दोन्ही हात जोडून महादेवन यांना अभिवादन केले.
गडकरी पुढे म्हणाले, शंकर महादेवन यांनी संघ गीतांना उत्तम प्रकारे स्वरबद्ध केले आहे. त्यांना हृदयातून हात जोडून धन्यवाद देतो. मी या कामात निमित्त मात्र आहे. जीवनात जे काही चांगले शिकायला मिळाले ते संघ आणि त्यामधील गीतांमधून. संघामध्ये असताना बौद्धीक होत होते. त्यावेळी ऐकलेल्या गीतांमधून डोळ्यात पाणी येत होते. शब्द आणि संगीतात किती ताकद आहे हे सर्वांना माहिती आहे. अनेक समर्पिक स्वयंसेवकांच्या जीवनात गीत तयार झाले आहेत. संघामध्ये गीत तयार झालेल्यांचे नाव कधीच पुढे येत नाही. संघाच्या गीतांवर पीएच.डी. झाली आहे. ज्येष्ठ प्रचारक आणि स्वयंसेवकांच्या मुखातून पुढे येणाऱ्या संघ गीतांमधून आम्ही भाव समजण्याचे काम केले. शंकर महादेवन यांची गाणी ऐकल्यावरही आमचे मन अतृत्प आहे. शरद केळकर आणि शंकर महादेवन यांचे नागपूरमध्ये ५० हजार लोकांसमोर संघ गीतांचा कार्यक्रम नक्की केला जाईल. संघ गीतांच्या शब्दामध्ये मोठी ताकद आहे. शंकर महादेवन यांच्या गायणाने संघ गीतांना अमर केले.
आगामी खासदार सांस्कृतिक महोत्सवात संपूर्ण संघगीत संग्रहातिल २५ गाणी गाण्यासाठी शंकर महादेवन यांना तसेच सूत्र संचालन करण्यासाठी निमंत्रण देत असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यावेळी त्यांनी प्रेरणादायी संघ गीतांच्या आठवणीना उजाळा दिला. ‘शत नमन माधव चरण’ हे संघ बौद्धिक ऐकलेले गीत कायम स्मरणात राहिले असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले. शब्दसुरांच्या ताकदीने संघ भाव या गीतांनी थेट मनापर्यंत पोहोचतो आणि त्याचा आपल्या व्यक्तित्वावर सकारात्मक परिणाम होतो असे गडकरी यावे म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रस्ते अपघाताबाबत नेहमीच चिंतेत असतात. रस्ते सुरक्षा संदर्भात त्यांनी अमिताभ बच्चन आणि शंकर महादेवन यांच्या आवाजात एक गाणंही तयार केलेला आहे. रस्ते सुरक्षा संदर्भात माहिती देण्यासाठी त्या गाण्याचा वापर सर्वत्र केला जातो. या गाण्याची तयारी सुरू असताना अमिताभ बच्चन, नितीन गडकरी आणि शंकर महादेवन एकदा मुंबईमध्ये जेवायला बसले होते. जेवण करत असतानाच त्यांना शताब्दी वर्षांमध्ये संघ गीतांना शंकर महादेवन यांच्या आवाजात स्वरबद्ध करावे अशी कल्पना आली. यानंतर ही कल्पना अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांना सांगण्यात आली. संघाच्या मदतीने पुढे महादेवन यांनी संघ गीते स्वरबद्ध केली. असा किस्साही गडकरींनी या कार्यक्रमात सांगितला.