नागपूर: आदिवासी खात्याच्या अखत्यारितील आदिवासी आश्रमशाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे यंदा शिक्षक भरतीबाबतच महत्वाचा निर्णय आदिवासी खात्याने घेतला आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या महत्त्वाच्या भरतीबाबत महत्वाचे भाष्य केले आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपुरातील प्रेस क्लबमध्ये शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. विदर्भातील आदिवासी आश्रमशाळांचा शुक्रवारी पहिला दिवस होता. एका शाळेत उईके स्वत: विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी हजर होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, यंदा शैक्षणिक गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही. प्रत्येक शाळेत एका पालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकांमार्फत शाळेतील दैनंदिन माहिती जाणून व अडचणी समजून त्या सोडवल्या जातील.
प्रत्येक आश्रमशाळेत एक एएनएम परिचारिका नियुक्त केली असून ती विद्यार्थिनीची काळजी घेईल. याशिवाय १ हजार ७९१ शिक्षकांची पदे बाह्यस्त्रोताच्या माध्यमातून भरण्याचे ठरवले आहे. या नियुक्या ‘पेसा’ कायद्यांतर्गत केल्या जातील. न्यायालयातील प्रकरणे मार्गी लागल्यानंतर मात्र ही पदे कायमस्वरूपी भरण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही उईके यांनी सांगितले.
काही शाळेत शिक्षकांच्या राहण्याची सोय नाही
आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांनी आश्रमशाळेतच राहायला हवे. परंतु राज्यातील काही आदिवासी आश्रमशाळेत शिक्षकांच्या राहण्याची सोय नाही. त्यामुळे हे शिक्षक जवळच कुठेतरी राहतात. परंतु लवकरच या शिक्षकांना आश्रमशाळेतच राहण्याची सोय उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जाईल, असेही उईके म्हणाले.
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान
आदिवासी जमातींच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान सुरू झाले आहे. यात राज्यातील ३२ जिल्हे, २१४ तालुके व ४,९७५ गावांचा समावेश आहे. २०२४- २५ ते २०२८- २९ या ५ वर्षांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ७९ हजार १५६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून आदिवास आश्रमशाळा व वसतिगृहांतील पायाभूत सुविधा सुधारणे, १०० आदिवासी बहुउद्देशीय विपणन केंद्राची तरतूद, सिलकसेल आजारावर समुपदेशन व जनजागृतीसह कौशल्य केंद्राची स्थापना व इतरही कामे केली जात असल्याचे उईके यांनी सांगितले.
कवडस येथील निवासी आश्रमशाळेत मंत्र्यांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात कवडस येथे आश्रमशाळेत शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी स्वतः विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी सरपंच उषा रविंद्र सावळे, आदिवासी विकासाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, उपायुक्त दिंगबर चव्हाण, आदिवासी एकात्मिक प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर व मान्यवर उपस्थित होते.