नागपूर : बनावट पदवी वाटपाच्या कोहचाळे प्रकरणात यापूर्वीही बदनाम झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवी संदर्भात नवा प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाच्या नावाने बनावट पदव्या तयार करून २६ जणांनी थेट इराकमध्ये नोकरी मिळविल्याची धक्कादायक माहिती आहे. इराक दुतावासाकडून या पदव्यांच्या पडताळणीसाठी विद्यापीठ आणि महविद्यालयासोबत झालेल्या पत्रव्यवहारातून ही बाब उघड झाली आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इराक येथील दुतावासामधून साकोली येथील बाजीराव करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी, वर्धेतील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शहरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात एक पत्र आले. त्यामध्ये तिथे नोकरी करणाऱ्या एकूण २६ विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांच्या पदवी आणि गुणपत्रिका त्याच महाविद्यालयातील आहे काय? अशी विचारणा करण्यात आली. यावर महाविद्यालयांकडून असे कोणतेही विद्यार्थी आमच्या महाविद्यालयात शिकले नसल्याची माहिती दिली गेली. त्यांचा नोंदणी क्रमांक नसल्याचेही पडताळणीत स्पष्ट केले. त्यानंतर दुतावासाकडून नागपूर विद्यापीठाला ईमेल करण्यात आला. पुन्हा हीच माहिती विचारण्यात आली. विद्यापीठाच्या पदवी आणि गुणपत्रिका तपासणी विभागाकडून या सर्व पदव्या आणि गुणपत्रिकांची शहानिशा केली असता, विद्यापीठाचा लोगो आणि कुलगुरूंची स्वाक्षरी असलेल्या या पदव्या आणि गुणपत्रिका बनावट असल्याचे आढळून आले.

हेही वाचा – नागपूर : खेळताना ‘बॅटरी’चा स्फोट, ९ वर्षीय मुलगा अत्यवस्थ

इराक दुतावासामधील समन्वयक अब्दुल हमीद यांनी याची खातरजमा करण्यासाठी १४ जूनला स्वतः विद्यापीठाला भेट दिली. या बनावट पदव्या बघून त्यांना चांगलाच धक्का बसल्याचे समजते. इराक येथील दुतावासाकडे आलेल्या पदव्या आणि गुणपत्रिका या २०१७, २०१९ आणि २०२० या दरम्यानच्या आहेत. विशेष म्हणजे, २०१९ आणि २०२० या काळात देशभरात करोनाचे सावट होते. सर्वाधिक २४ पदव्या या फार्मसीच्या, २ अभियांत्रिकी तर एक मायक्रोबायोलॉजीच्या आहेत.

हेही वाचा – नागपूर : जिल्ह्यातील पहिले शासकीय तंबाखू मुक्ती केंद्र सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामुळे तपास लागला

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी त्यांचे सर्व दस्तावेज इराकच्या फॉरेन रिजनल रजिस्ट्रेशन ऑफीस’ (एफआरआरओ) यांच्याकडे पाठवण्यात आले होते. या कार्यालयाला सादर केलेल्या पदव्या व गुणपत्रिका बनावट असल्याचा संशय आला. त्यानुसार संबंधित महाविद्यालयांना जूनच्या पहिल्या आठवड्यात पत्र पाठविले. त्यानंतर विद्यापीठाकडे विचारणा करण्यात आली.