नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागातील (एफडीए) भरारी पथकाच्या नावावर राज्यातील काही भागात बनावट भरारी पथके व्यावसायिकांवर छापे घालून वसुली करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात धुळे व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी एक गुन्हाही दाखल झाला आहे.

धुळे जिल्ह्यातील थाळनेर आणि जळगाव जिल्ह्यातील चोपडा पोलीस ठाण्यात या प्रकरणात जानेवारी २०२४ मध्ये गुन्हे दाखल झाले. त्यातील एक आरोपी पोलीस विभागातील निलंबित कर्मचारी तर दोन आरोपी खासगी क्षेत्रातील आहेत. या तिन्ही आरोपींनी १९ जानेवारी २०२४ रोजी धुळे जिल्ह्यातील रा. तरडी, पो. हिसाळे येथील एका किराणा व्यावसायिकाच्या घरी जाऊन स्वत:ला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगितले व तुमच्याकडे प्रतिबंधित गुटख्याचा साठा आहे, असे सांगत कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर व्यावसायिकाकडून १ लाख रुपये घेऊन पसार झाले. थोड्याच वेळाने एफडीएच्या खऱ्या अधिकाऱ्यांनी याच व्यावसायिकाकडून प्रतिबंधित गुटखा जप्त केला. त्यानंतर व्यावसायिकाला त्याची फसवणूक झाल्याचे कळले.

हेही वाचा…नागपुरात डॉक्टरांनाही डेंग्यू, चिकनगुनियाचा विळखा

दरम्यान, या प्रकरणात दोन आरोपींना चोपडा पोलिसांनी अटक केली. संबंधित व्यावसायिकानेही या आरोपींना ओळखले. आरोपी तेथेही त्यांची अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांसोबत जवळीक असल्याचे सांगत पोलिसांवर दबाव आणत होते. पण, पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध प्रथम चोपडा पोलीस ठाण्यात व नंतर धुळे जिल्ह्यातील थाळनेर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल केले. या प्रकरणात आरोपींना मदत करण्यासंदर्भात एफडीएच्या एका अधिकाऱ्यावरही प्रचंड दबाव होता. परंतु, त्यांनी दबाव झुगारल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.

भरारी पथकही वादात

अन्न व औषध प्रशासन विभागाने जानेवारी महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीच्या भोवऱ्यात अडकलेल्या काही अधिकाऱ्यांचा समावेश असलेले भरारी पथक तयार केले होते. हे पथक राज्यातील प्रमुख शहरातील व्यावसायिकांवर छापे घालून पुढील कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी करीत होते, असे या विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले.

हेही वाचा…उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा समृद्धी महामार्गावरून प्रवास, अधिकाऱ्यांच्या दाव्याची पोलखोल….

“अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नावावर होणाऱ्या अवैध छापेमारीशी आमचा संबंध नाही. जे कुणी विभागाच्या नावावर हा प्रकार करीत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कुणीही खासगी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये.” – धर्मरावबाबा आत्राम, मंत्री, अन्न व औषध प्रशासन

हेही वाचा…करदात्यांचे पैसे मोफत का वाटत आहात? उच्च न्यायालयात याचिका….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्र्यांच्या बंगल्यावर तिऱ्हाईताकडून खातेबैठका

अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुंबईतील ‘सुरुची’ या शासकीय निवासस्थानी एक खासगी व्यक्ती अधिकाऱ्यांची अनधिकृत बैठक घेऊन त्यांना निर्देश देत असल्याने विभागाच्या अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांच्या संघटनेने याबाबत मंत्र्यांकडे तक्रारही केली आहे.