नागपूर: राज्यभर गाजत असलेल्या बनावट शालार्थ ओळखपत्र घोटाळा प्रकरणात सायबर शाखेनंतर आता विशेष तपास पथकानेही गुरुवारी बनावट शालार्थ ओळखपत्रावरून शिक्षक बनून पगार लाटणाऱ्या तीन शिक्षकांवर हंटर चालवला. यात दोन महिला सहाय्यक शिक्षिकांचा समावेश आहे.
या घोटाळा प्रकरणात सायबर शाखेने बुधवारी रोहिणी विठोबा कुंभार (माध्यमिक) आणि सिद्धेश्वर श्रीराम काळुसे (प्राथमिक) यांना पदाचा गैरवापर करीत राज्य सरकारची १०० कोटी रुपयांची फसवूणक केल्याचा ठपका ठेवत अटक केली. त्याच्या अवघ्या काही तासांतच विशेष तपास पथकाने गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रेस तालुक्यातले सहाय्यक शिक्षक सतिश विजय पवार, नागपुरच्या दिघोरीतील आदर्श शाळेच्या सहाय्यक शिक्षिका भुमिका सोपान नखाते आणि म्हाळगी नगरातल्या विद्याभूषण शाळेच्या सहाय्यक शिक्षिका प्रज्ञा विरेंद्र मुळे या तिघांना अटक केली.
या तिघांनीही बनावट शालार्थ ओळखपत्राच्या आधारे नियुक्ती मिळवत वेतनापोटी २५ लाख रुपये लाटले. त्यामुळे राज्य शासनाची फसवणूक झाल्याच्या आशयाची तक्रार विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी रविंद्र पाटील यांनी दिली होती. त्या आधारे तपास पथकाने केलेल्या चौकशीत या तिघांनी बनावट शालार्थ ओळपत्राद्वारे नियुक्ती मिळविल्याचे सिद्ध झाले. फसवणूकीत स्पष्ट सहभाग आढळल्याने एसआयटीने गुरुवारी त्यांना अटक केली.
एसआयटी अटकेतील संख्या १७ वर
बनावट शालार्थ ओळखपत्र घोटाळा प्रकरणात विशेष तपास पथकासह सायबर शाखा समांतर तपास करीत आहे. या दोन्ही पथकांनी आतापर्यंत २६ जणांना अटक केली आहे. त्यापैकी एकट्या एसआयटीच्या ताब्यातील अटकेची संख्या आता १७ झाली आहे. यात ३ विभागीय शिक्षण उपसंचालक, ३ शिक्षणाधिकारी, ४ लिपीक, २ मुख्याध्यापक आणि २ शाळा संचालकांचा समावेश आहे. यात आता आणखी ३ शिक्षकांची भर पडली आहे. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या आता २९ झाली आहे.