नागपूर: जून महिना संपत आला असला तरी अद्याप विदर्भात पावसाने हजेरी लावलेली नाही. आता हवामान विभागाने २२ जूनपासून पावसाचा अंदाज दिला आहे. मात्र, इतके दिवस पावसाने दडी मारल्याने त्याचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला असून मासोळीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
विदर्भात गोड्या पाण्यात मासेमारी केली जाते. मात्र, पावसाने दडी मारल्याने नदी, नाले आणि तलावातील पाण्याची पातळी प्रचंड कमी झाली आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. मासे कमी मिळत असल्याने बाजारात मासोळीच्या दरात प्रती किलो शंभर ते दिडशे रुपयांनी वाढ झाली आहे. पाऊस न आल्यामुळे मासोळीच्या दरात वाढ होण्याची वेळ अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच आल्याची माहिती मासोळी व्यवसायिकांनी दिली.
नैऋत्य मोसमी वारे पुढील दोन दिवसांत राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीडगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि जम्मूमध्ये आगेकूच करतील आणि लवकरच देशाचा उर्वरीत भाग व्यापतील अशी आशा आहे. सध्या गुजरात आणि पश्चिम किनारी प्रदेशात मान्सून सक्रिय स्थितीत आहे. पुढच्या २४ तासांत गुजरातमध्ये तुरळक ठिकाणी अतीवृष्टीची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतीजोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकणात इतर बहुतांश ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भात हलका ते मध्यम पाऊस, विजा आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यामुळे २२ जून रोजी रायगड आणि रत्नागिरी हे जिल्हे तसंच पुण्यातील घाटप्रदेशात पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर कोकण आणि घाटप्रदेशातील उर्वरीत भागात पावसासाठी यलो अलर्ट आहे. त्याशिवाय परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी पावसासाठी यलो अलर्ट दिला आहे.