चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील वन विभागाच्या विरुर वनपरिक्षेत्रात जुलै ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ३२ लाख ६८ हजार रुपयांच्या शेणखत खरेदी घोटाळ्याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षकांनी पाच वनरक्षक आणि दोन वनपालांना निलंबित केल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.
विरुरचे वनरक्षक संतोष संगमवार, सिद्धेश्वरचे इक्बाल शेख आणि चिंचोली येथील वनरक्षक गोपीचंद राठोड, विरुरच्या अश्विनी ताजणे, सोंडा परिसरातील लक्ष्मी आडे, डोंगरगाव परिसरातील ए. व्ही. मस्तान, सिद्धेश्वरचे वनरक्षक कुंडलिक कोळेकर अशी निलंबित वन अधिकाऱ्यांची नावे आहेत. यापूर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांना निलंबित करण्यात आले होते.
तेलंगणा-महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील विरुर वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण केल्यानंतर विकासासाठी शेणखताचा वापर करण्याची योजना आखण्यात आली होती. परंतु जुलै ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी शेणखत खत खरेदी केले नाही. त्यांनी तत्कालीन अधीनस्थ वनपाल आणि वनरक्षकांशी संगनमत करून बनावट देयके सादर केली. याद्वारे विरूर २, चिंचोली ४, कवितपेठ २, भेंडाळा १, सोंडो २, सिद्धेश्वर २, डोंगरगाव १ अशा १४ गवत लागवडींमध्ये ३२ लाख ६८ हजार ६०८ रुपयांचा अपहार करण्यात आला. याची माहिती मिळताच मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, मध्यचंदा उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी चौकशी पूर्ण करून अहवाल सादर केला. अहवालानुसार, दोषी आढळल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी येलकेवाड यांना निलंबित करण्यात आले.
सोमवारी (दि . २ जून) मुख्य वनसंरक्षक डॉ. रामगावकर यांनी विरूर वनरक्षक संतोष संगमवार आणि सिद्धेश्वर वनरक्षक इक्बाल शेख यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले. वन विभागाने सांगितले की, २६ मे २०२५ रोजी उप वनसंरक्षक बोड्डू यांनी वनरक्षक गोपीचंद राठोड, वनरक्षक अश्विनी ताजणे, लक्ष्मी आडे, ए.व्ही. मस्तान, वनरक्षक कुंडलिक कोळेकर यांना निलंबित केले.
निलंबित वन अधिकाऱ्यांची एकूण संख्या आठ झाली आहे. मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर आणि उप वनसंरक्षक मध्य चंदा श्वेता बोड्डू यांच्या संयुक्त आदेशानुसार दोन वनरक्षक आणि पाच वनपालांना निलंबित करण्यात आले आहे अशी माहिती एम.बी. दिघे, वन परिक्षेत्र अधिकारी, विरूर स्टेशन यांनी दिली.