गडचिरोली : सहा राज्यात ‘मोस्ट वांटेड’ असलेला जहाल नक्षल नेता तसेच नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य गजर्ला रवी उर्फ उदय याला ठार करण्यात आंध्रप्रदेश पोलिसांना यश आले आहे.

चकमकीत रविसह नक्षल नेता चलपती याची पत्नी रावी व्यंकट चैतन्य उर्फ अरुणा आणि अंजु या दोघींचाही खात्मा करण्यात आला. १८ जून रोजी आंध्रप्रदेशच्या अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील मारडपल्ली जंगलात ही चकमक झाली. विविध राज्यात मिळून गजर्ला रवीच्या डोक्यावर एकूण तीन कोटींचे बक्षीस होते.

आंध्रप्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील मारडपल्लीच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. यावरून १८ जून रोजी विशेष नक्षलविरोधी पथक ‘ग्रेहाउंड्स’च्या जवानांनी या परिसरात शोधमोहीम राबवली होती. दरम्यान, पहाटे सहा वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसाच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात केंद्रीय समिती सदस्य गजर्ला रवी उर्फ उदय, झोनल समिती सदस्य अरुणा उर्फ रावी व्यंकट चैतन्य आणि प्लाटून सदस्य अंजु ठार झाले.

गजर्ला रवी ऊर्फ उदय हा नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. त्याचा खात्मा झाल्याने नक्षलवादी चळवळीला जबर हादरा बसला आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या अनेक मोठ्या हल्ल्यांमागे त्याचा हात होता. मूळचा तेलंगणातील रहिवासी असलेल्या रवी उर्फ उदयवर आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र आणि झारखंड या सहा राज्यांमध्ये मिळून तीन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. रवी नक्षलवाद्यांच्या आंध्रा-ओरिसा बॉर्डर समितीचा सचिव तसेच आंध्र प्रदेश स्पेशल झोनल समितीचा सदस्य म्हणूनही कार्यरत होता. तीन राज्यांच्या सीमावर्ती भागांमध्ये त्याचा मोठा प्रभाव होता. त्याच्यासोबत अरुणालाही जवानांनी ठार केले. ती नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्य चलपती याची पत्नी होती. तसेच, ती वरिष्ठ नक्षलवादी नेता चेरकुरी राजकुमार ऊर्फ आझादची बहीण होती. तिच्यावरही ५० लाख रुपयांचे बक्षीस होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छत्तीसगडमधून पलायन

छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुजमाड आणि इंद्रावती नॅशनल पार्क भागात सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या आक्रमक कारवायांमुळे नक्षल चळवळीतील नेते शेजारच्या राज्यात स्थलांतरित होत आहे. त्यामुळे दोन दशकापासून पासून मध्य प्रदेश तेलंगाना आंध्र प्रदेशमध्ये नक्षल कारवाया शून्य होत्या. पण मागील वर्षभरापासून या ठिकाणीही चकमकी वाढल्या आहे. विशेष म्हणजे, वरिष्ठ नक्षल नेतेही लपण्यासाठी सुरक्षित ठिकाणांच्या मागावर आहे.