नागपूर: राज्यात विविध ठिकाणी निर्माण झालेल्या पूरस्थितीवर राज्य सरकार सर्वतोपरी लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार राज्यातील पूरग्रस्त भागात तातडीची मदत पोहोचवली जात असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री व नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

ते नागपूर येथील नियोजन भवनात प्रसार माध्यमांशी बोलत होते. पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू आहे. ज्या भागात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे, त्या ठिकाणी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. पंचनामे सुरू असून जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय मुंबईतील वॉर रूम मधून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून आवश्यक तातडीची मदत पोहोचवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधींवर टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, मतदार यादीचे पुनर्निरीक्षण ही सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे. निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवण्याची वेळ असताना काँग्रेसने काहीच कारवाई केली नाही. मात्र आठ महिन्यांनंतर राहुल गांधी यांनी “वेड्यासारखी वक्तव्ये” करणे योग्य नाही. काँग्रेस पक्ष लयाला जात असताना विरोधकांकडून निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर सतत आरोप केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तेव्हा ईव्हीएम चांगले, पण पराभव झाला की मशीन खराब असे म्हणणे चुकीचे आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आक्षेप घ्यायचे असतील तर निवडणूक प्रक्रियेदरम्यान घ्यावेत, परंतु पराभवानंतर पुन्हा मतदार यादीवर दोषारोप करणे योग्य नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

शालार्थ आयडी संदर्भात भूमिका

शालार्थ आयडी प्रकरणी शिक्षकांना दिलासा देत बावनकुळे म्हणाले की, अनेकांनी कर्ज घेऊन संचालकांनी गैरव्यवहार केले आहेत. त्यात शिक्षकांचा काहीही दोष नाही. उलट शिक्षण संचालकांची संपत्ती जप्त केली पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्यासोबत चर्चा करून ठोस तोडगा काढला जाईल.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, २०२९ पर्यंत विकसित नागपूर हे आमचे स्वप्न असून विकसित महाराष्ट्रासोबत विकसित नागपूर साकार करण्यासाठी तीन टप्प्यात नियोजन करण्यात येईल. बचत गटाच्या माध्यमातून पशुधन विकासासह विविध योजना राबवल्या जातील. जिल्हा नियोजन समितीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे, असेही त्यांनी नमूद केले.