नागपूर: हृदय आणि रक्तवाहिन्यांशीसंबंधित आजार हे जगभरात मृत्यूचे प्रथम क्रमाकाचे कारण आहे. हृदयाशी संबंधित आजार आणि हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल करणे गरजेचे आहे. पाश्चात्य लोकसंख्येच्या तुलनेत भारतीयांना कमी वयात म्हणजेच १० ते १५ वर्षं लवकर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. सध्याच्या आकडेवारीनुसार, हृदयविकारामुळे ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या बळींची टक्केवारी सुमारे ४० टक्के आहे. ही चिंताजनक स्थिती आहे. हृदयविकाराचा झटका हा जीवनशैलीशी निगडित विकार आहे. हृदयविकाराचा धोका असलेल्यांना डॉक्टर अनेकदा मासांहार न करण्याचा सल्लाही देतात. परंतु, यामध्ये एक महत्त्वाचे संशोधन समोर आले आहे.

केंद्रीय खारा पाणी जलजीव अनुसंधान संस्था कोलकाताचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. बी.एन.पौल यांनी सांगितले की, मांसाहार करणाऱ्यांसाठी मासे हे सर्वात चांगले खाद्यपदार्थ आहे. तसेच ज्यांना हृदयरोगाचा धोका असेल त्यांच्यासाठी मासे उपयुक्त आहे. माशांमध्ये ओमेगा तीन असून ते हृदयासाठी फार उपयुक्त ठरते असेही ते म्हणाले. त्यामुळे मांसाहार करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची गोष्ट राहणार आहे.

हेही वाचा – नागपूर : प्रेमविवाहानंतर ४,९४७ पती-पत्नीच्या संसारात विघ्न; भरोसा सेलकडून नवविवाहित दाम्पत्यांचे….

मासा हे मानवाच्या दृष्टीने पौष्टिक अन्न आहे. यातील प्रथिने शरीराला पोषक आहे. परंतु, या माशांनाही पौष्टिक खाद्य देणे आवश्यक असल्याची माहिती केंद्रीय खारा पाणी जलजीव पालन अनुसंधान संस्था चेन्नईचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. अम्बा शंतरा यांनी दिली. छोट्या बाळाला ज्याप्रमाणे त्याच्या वयानुसार आवश्यक अन्न दिले जाते तिच गोष्ट माशांनाही लागू होते. ते मानवासाठी पौष्टिक अन्न असले तरी माशांनाही त्यांच्या वयानुसार पौष्टिक खाद्य देणे आवश्यक असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत येत असलेल्या पशुवैद्यक महाविद्यालयाचे पशुआहार शास्त्र विभाग आणि पशुआहार शास्त्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पशुआहार शास्त्र परिषदेसाठी आले असता त्यांनी मत्स्यव्यवसाय आणि त्यांच्या आहारावर ‘लोकसत्ता’शी बातचित केली.

हेही वाचा – ‘नाईट पार्टीं’मुळे ग्रामस्थांसह वन्यजीवांना त्रास; ताडोबालगतच्या रिसॉर्ट्स, हॉटेल्समध्ये रात्रभर चालतो ‘धांगडधिंगा’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी केंद्रीय खारा पाणी जलजीव अनुसंधान संस्था कोलकाताचे डॉ. बी.एन.पौल, माफसूचे डॉ. प्रशांत तेलवेकर यांनीही संवाद साधला. डॉ. अम्बा शंतरा म्हणाले, विदर्भात मत्स्य व्यवसायामध्ये मोठी संधी असून तो शेतीला पूरक आहे. यासाठी माशांच्या आहारावर अधिक लक्ष केंद्रित करणे फार आवश्यक आहे. आपल्या भागात उत्पादन होणाऱ्या वस्तूंपासूनच माशांचे खाद्य तयार होत असून त्यावर काम करणे आवश्यक आहे. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ, कापूस, सोयाबीन उत्पादन होते. त्यांच्या टाकाऊ वस्तू (ढेप) पशुखाद्य म्हणून पौष्टिक असतात. परंतु, सध्या माशांच्या खाद्याचे उत्पादन हे हैदराबाद आणि अन्य शहरांमध्ये होते. परिणामी, उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे स्थानिक भागात उत्पादन केल्यास माशांसाठी आवश्यक असणाऱ्या खाद्याचे दर कमी होतील. यामुळे मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांना अधिक नफा कमावता येईल.