लोकसत्ता टीम
वर्धा: जयपूर काँग्रेस अधिवेशनात ग्राम व प्रभाग पातळीवर मंडळ समित्या स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार प्रदेश समिती कामाला लागली. प्रत्येक जिल्ह्यात या मंडळ समित्या स्थापन व्हाव्या म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश चिटणीस यांना जिल्हा प्रभारी नेमत समित्या गठीत करण्याचे काम त्वरित व्हावे म्हणून जबाबदारी दिली. पण राज्यात याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संथ प्रतिसाद दिला.
यामुळे नाराज झालेल्या पटोले यांनी सरचिटणीस देवानंद पवार यांच्या मार्फत वारंवार इशारे पण दिले. तरीही कार्यकर्ते आळस सोडायला तयार नसल्याचेच चित्र पुढे आले. अखेर परत इशारा आला. अ. भा.काँग्रेस समितीने मंडळ समित्यांचा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. त्यांच्याकडून सतत विचारणा होत आहे. नव्या मुदतीत जर स्थापन झाल्या नाहीत तर तसा अहवाल राष्ट्रीय कार्यकारिणीला पाठवू, अशी निर्णायक तंबी प्रदेश समितीने दिली आहे.