अमरावती: जिल्ह्यात अकरा महिन्यांत ५४४ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. सप्‍टेंबर ते नोव्‍हेंबर या कालावधीत रुग्‍णवाढ अधिक आहे. एका रुग्‍णाचा डेंग्‍यूमुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद ऑक्‍टोबर महिन्‍यात झाली. गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत डेंग्‍यूच्‍या रुग्‍णसंख्‍येत यंदा वाढ झाल्‍याने आरोग्‍य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

२०२२ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत १८५ डेंग्यू रुग्णसंख्‍या होती. यंदा ही आकडेवारी तीनपटीने वाढली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून डेंग्यू रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. डेंग्यू हा एडिस इजिप्ती या मादी डासाच्या चाव्यामुळे होतो. यामध्ये रुग्णाला डोकेदुखी, तीव्र तापासोबत स्नायू आणि सांधेदुखीचा त्रास होतो. यासोबतच डेंग्यूच्या तापामुळे शरीरातील प्लेटलेटचे प्रमाण देखील कमी होऊ लागते. जर प्लेटलेटची संख्या जास्तच कमी झाली की, रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो.

हेही वाचा… घरकामासाठी नेतो म्हणून सांगितले अन् महिलेला दोन लाखात विकले; पाच जणांवर गुन्हे

कीटकजन्य आजारांचे प्रमाण हे पावसाळ्यात वाढायला सुरूवात होते. ज्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया हे आजार डोके वर काढतात. जागोजागी साचणाऱ्या पाण्यामध्ये डेंग्यू आजार पसरविणारे डास वाढतात. सध्या वातावरणातील बदलामुळे निर्माण झालेला थंडावा हे कीटकजन्य आजार वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने रुग्णालयात जाऊन रक्ताची चाचणी करण्याची गरज आहे. जिल्ह्यात जून २०२३ पासून डेंग्यू रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली असून, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांमध्ये सर्वाधिक डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. तर ऑक्टोबर महिन्यात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आरोग्य प्रशासनाने केली आहे.

हेही वाचा… “आली रे आली आता थंडी आली…” राज्यात थंडीला सुरुवात, हवामान खाते म्हणते…

अमरावती महापालिका क्षेत्रात सर्वाधिक डेंग्यू रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात १०२७ डेंग्यू संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने आरोग्य विभागाने तपासण्‍यात आले. यामध्ये ३३३ रुग्ण सकारात्‍मक आढळले आहेत. यामध्ये एकाचा मृत्यूदेखील डेंग्यूमुळे झाल्याची नोंद आरोग्य प्रशासनाने केली आहे तर ग्रामीण भागातील १२८८ संशयित रुग्णांमध्ये २११ रुग्णांचा अहवाल सकारात्‍मक आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यात डेंग्यूबरोबरच अकरा महिन्यांमध्ये ११६ चिकुनगुनिया रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागात ७९ तर महापालिका क्षेत्रात ३७ रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर मलेरियाचे एकूण ३३ रुग्ण असून, ग्रामीण क्षेत्रात २८ तर मनपा क्षेत्रात ५ रुग्ण आढळले आहेत.
महाराष्‍ट्रात २०२२ मध्‍ये डेंग्‍यूचे ८ हजार ५७८ रुग्‍ण आढळून आले होते, तर २७ रुग्‍णांच्‍या मृत्‍यूची नोंद झाली होती. यावर्षी ३० नोव्‍हेंबर अखेर १७ हजार ५३१ डेंग्‍यूचे रुग्‍ण आढळून आले आहेत, तर १४ जणांचा मृत्‍यू झाला आहे.