भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशातील मातब्बर नेत्यांनी कंबर कसली आहे. आज भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार खा. सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोहाडी येथे सकाळी जाहीर सभा झाली. मात्र, सभेला संबोधित करताना त्यांनी स्वतः केलेल्या कामांचाच पाढा वाचला. त्यामुळे ते भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी आले होते की स्वतःच्या प्रचारासाठी अशी चर्चा रंगू लागली.

भंडारा गोंदिया क्षेत्राचे भाजपचे उमेदवार खा. सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सभेला संबोधित करताना ते सुरुवातीलाच त्यांनी त्यांचे परखड मत मांडले. ते म्हणाले की, भंडारा जिल्हा हा खनिज, जंगल, पाणी अशा नैसर्गिक साधन संपत्तीने समृध्द आहे मात्र एवढे सगळे असून अद्याप या जिल्ह्याचा अपेक्षित असलेला विकास झालेला नाही. तो करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात नद्या आहेत मात्र पाटीस पाणी साठवण्याची क्षमता विकसित केलेली नाही. गोसेखुर्द आणि बावनथडी सारखे धरण, कालवे झाले मात्र शेतकरी आजही सिंचनाच्या पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना जिल्ह्यात पुढे विकासाची व्हिजन दृष्टी काय असली पाहीजे यावर विचार करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी विकास काम करताना कमी पडत आहेत असेच सुचविले.

हेही वाचा…video: तहानेने व्याकुळलेली वाघीण तिच्या बछड्यासह थेट तलावावर

या उन्हाळ्यात सर्व मालगुजारी तलावांचे खोलीकरण करून पाण्याचा साठा दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्लाही त्यांनी खा. मेंढे यांना यावेळी दिला. शिवाय मी फुकटात तुमच्या जिल्ह्यातील तलावांचे खोलीकरण आणि नदी नाल्यांचे रुंदीकरण करून देतो असे सांगून देशात आमच्या योजनेचा फायदा घेतला तुम्हीही घ्या असेही त्यांनी आमदार आणि खासदार यांना संबोधले. दुध उत्पादनातही भंडारा जिल्हा विदर्भात पहिल्या क्रमांकावर असून आता दूध उत्पादक शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरावे.

पुढे बोलताना नितीन गडकरी यांनी त्यांनी केलेल्या विकास कामांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. त्यांना किती डी. लिट. मिळाले हे सांगत त्यांनी केलेले पाण्याचे नियोजन, हजारो तलावांचे बांधकाम, खोलीकरण आणि पुनरुज्जीवन केल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय ऊस उत्पादन क्षेत्रात त्यांनी केलेला ड्रोनचा वापर, फार नफा नसतानाही ते शेतकऱ्यासाठी साखर कारखाने चालवतात, फिशिंगमध्ये त्यांनी आणलेली नवीन पॉलिसी, रस्त्यांचे, महामार्गाचे काम तसेच उमरेड जवळ त्यांनी आणलेल्या इथेनॉल प्रकल्पाबद्दलही त्यांनी माहिती दिली. त्याचवेळी डॉ. परिणय फूके यांनी इथेनॉल प्रकल्प येथे आणण्याचे ठरविले होते अशी आठवण करून देत ते आणू शकले नाही मात्र आम्ही करून दाखविले असेच सूचित केले.

हेही वाचा…भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे निर्देश, ‘अर्ज मागे घेऊन युतीधर्माचे पालन करा’ तर बंडखोर विजयराज शिंदे म्हणतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल असे आश्वासन देत नागपूरमध्ये त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती आणि कोविड काळात त्यांनी केलेल्या कामांची माहिती सुध्दा त्यांनी दिली. मी बोलतो ते मी करतोच असे ते म्हणाले. माझ्याकडून काम होत नसेल तर मी तोंडावर नाही असे सांगतो असे ते म्हणाले. पण मी खोटं नाही बोलत. मी ९० टक्के समाजकारण करतो आणि १० टक्के समाजकारण करतो. जातीपातीच राजकारण करत नाही. माणूस हा जातीने मोठा नाही, गुणाने मोठा आहे. जातीयता अस्पृश्यता नष्ट केली पाहिजे आणि सामाजिक समानता निर्माण केली पाहिजे, असंही ते म्हणाले. नितीन गडकरी यांनी भंडाऱ्यात काय काय विकास कामे होणे अपेक्षित आहे हे सांगतानाच त्यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. नितीन गडकरी हे सुद्धा नागपूर लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार असल्याने ते त्यांच्याच प्रचार तर करीत नाहीत ना अशा चर्चांना उधाण आले.