लोकसत्ता टीम

बुलढाणा: येत्या १८ मे रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील ७७ ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात ग्रामीण नेते व कार्यकर्त्यांचा निरुत्साह दिसून आला. पहिल्या दोन दिवशी एकही अर्ज दाखल करण्यात आला नसून सध्या सुरू असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांचा हा परिणाम असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्यांच्या ९६ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यासोबतच मेहकर, लोणार, जळगाव, मलकापूर तालुक्यातील प्रत्येकी १ तर संग्रामपूर तालुक्यातील ४ सरपंचाची थेट जनतेतून निवड होणार आहे. यंदा अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरण्याची मुभा देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सरपंच व सदस्य पदाचे आकर्षण आजही कायम आहे. असे असतानाही गावपुढाऱ्यांची उदासीनता चक्रावून टाकणारी आहे.

हेही वाचा… चंद्रपूर: अमृत योजना नियाेजनशून्य! पाण्यासाठी हाहाकार, सव्वा चार लाख लोकसंख्येसाठी १२ टँकर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२५ एप्रिल ते २ मे ही अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मात्र, काल आणि आज २६ ला जिल्ह्यात एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे आता नामांकनासाठी केवळ तीनच दिवस उरले आहे. अंतिम मुदत २ मे असली तरी ती सुट्टीचे दिवस वगळून आहे. त्यामुळे आता अर्ज भरण्यासाठी केवळ २७, २८ एप्रिल व २ मे हे तीन दिवसच उरले आहे. २९ ला शनिवार, ३० ला रविवार आणि १ मे महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे. आता या तीन दिवसात किती अर्ज येतात त्यावर लढतीचा रोमांच अवलंबून आहे.