बुलढाणा : मागील काळात मराठा आरक्षणाला द्वेष भावनेतून कडाडून विरोध करणाऱ्यांमुळे गोरगरीब मराठा बांधवांचे अपरिमित नुकसान झाले. मात्र, आता आरक्षणाच्या आड येणाऱ्यांच्या नरडीचा मी घोट घेईन, त्याला फाडून खाईल, असा इशारा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाचे भूमिपूजन सोहळा आज, मंगळवारी पार पडला. यावेळी हे विधान करून त्यांनी सभास्थळी खळबळ उडवून दिली. माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदारद्वाय रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, माजी खासदार उल्हास पाटिल यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांनी हे विधान केले. गायकवाड म्हणाले की, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्याला कुणी कडाडून विरोध केला हे सर्वांना माहीत आहे. मी ‘त्याचे’ नाव घेणार नाही. मात्र, यापुढे जर कुणी मराठा आरक्षणाला विरोध केला तर त्याचा जीव घेईल, असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला.
हेही वाचा : नागपूर : पत्नी परपुरुषासोबत नको त्या अवस्थेत दिसली, संतापलेल्या पतीने…
या विरोधामुळे सामान्य समाजबांधवाचे नुकसान झाले. आज राज्यात जी हिंसक आंदोलने सुरू आहे, हा मराठा युवकात असलेला प्रचंड असंतोष आहे. मी याचे समर्थन करणार नाही, असे सांगून स्वतः जरांगे पाटील यांनीही अशी आंदोलने न करण्याचे आवाहन केले आहे. गरिबीला जात नसते, असे सांगून शेती आता आतबट्ट्याचा व्यवसाय झाल्याचे ते म्हणाले. यामुळे आता आरक्षणाच्या आडवे येणाऱ्याची गय करणार नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची धग कायम आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाच्या आमदारांनी केलेल्या या विधानाने राज्यातही खळबळ उडण्याची दाट शक्यता आहे.