नागपूर : साध्या सरळ मार्गाने वागणाऱ्यांना कशाचेही भय नसते. पण गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले आपल्याच कुरापाती वागणुकीतून कायम शत्रू निर्माण करत असतात आणि वारंवार गुन्हेगारीच्या दलदलीत फसत जातात. असाच काहीसा प्रकार राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे शहर गुन्हेगारांची देखील उपराजधानी बनत आहे, का असा सवाल यातून उपस्थित होत आहे.
हाती शस्त्र घेणे आणि एखाद्याला घाबरविण्याच्या इराद्याने शस्त्र बाळगणे हा कायद्याने अपराध आहे. मात्र आपण हा अपराध करतोय आणि कायदा त्यामुळे शिक्षा देईल याचे देखील भय गुन्हेगारांना राहिले नाही. गुन्हे शाखा सातत्याने करीत असलेल्या नुसत्या कारवायांवर नजर टाकली तर हे वास्तव समोर येईल.
पोलिसांनी शहराच्या विविध भागांमध्ये ३० मे ते ६ जून या अवघ्या सात दिवसांच्या कालावधीत दिवसाढवळ्या बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगत बिनदिक्कत फिरणाऱ्या ६७ जणांवर कारवाई केली. यातून पोलिसांनी जवळजवळ ६५ घातक शस्त्रे जप्त केली. आरोपींकडून ताब्यात घेण्यात आलेल्या या शस्त्रांमध्ये तलवार, कोयता, सत्तूर, गुप्ती, फरशा, भाला सारख्या हत्यारांचा समावेश आहे.
शहराच्या हद्दीतील जवळजवळ सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये ही शस्त्रे सापडली आहेत. यावरून गुन्हेगारांना कायद्याचे कसलेही भय उरलेले नसल्याचेही आता समोर येत आहे. विशेष म्हणजे गेल्या ७ दिवसांत पोलिसांनी जी ही शस्त्रे पकडली आहेत, त्या सात दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन वेळा शहरात होते. त्यामुळे खुद्द गृहमंत्री शहरात तळ ठोकून असताना बेलगाम झालेले गुन्हेगार भर दिवसा शस्त्र बाळगत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहेत. यातून पोलिसांच्या धाकावरही सवाल उपस्थित होत आहे.
ग्रामीणमध्येही सापडली पिस्तूल आणि काडतूस
रामटेक गुन्हे शाखेच्या पथकाने अलिकडेच कांद्री येथे केलेल्या कारवाईत रजत दोंदलकर या तरुणाला पिस्तूल आणि दोन जीवंत काडतूसासह ताब्यात घेतले आहे. पिस्तुल बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना तो हे शस्त्र घेऊन फिरत होता. मध्यप्रदेशातून त्याने हे पिस्तुल विकत घेतल्याचेही कबुल केले आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात कायद्याचे राज्य शिल्लक राहिले आहे, का असा सवालही उपस्थित होत आहे.