नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील शैक्षणिक परिसरातील सर्व विभागांना विद्यापीठाने शैक्षणिक स्वायत्तता दिली आहे. विभाग स्वायत्त झाल्याने येथील विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांच्या गुणवत्ता यादीमध्ये आता समावेश होणार नसल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या १११ व्या दीक्षांत सोहळ्यात सुवर्ण पदक मिळण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगणार आहे.

नुकताच शतकोत्तर सोहळा साजरा करणाऱ्या नागपूर विद्यापीठाने ऐतिहासिक निर्णय घेत सर्व पदव्युत्तर विभागांना स्वायत्तता प्रदान करण्याचा निर्णय २०२१ मध्ये घेतला. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी हे क्रांतिकारक पाऊल उचलून सर्व विभागांना स्वतंत्र दर्जा देत त्यांना स्वतःचा अभ्यासक्रम तयार करण्यापासून तर परीक्षा घेण्यापर्यंतचे अधिकार दिले. दोन वर्षांपासून याची सुरुवात करण्यात आली आहे. विद्यापीठातील ४३ विभागांचा यात समावेश असून ४ हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. हे सर्व पदव्युत्तर शैक्षणिक विभाग स्वायत्त झाल्याने येथील गुणवंत विद्यार्थ्यांना मात्र फटका बसतो आहे. विद्यापीठाकडून दरवर्षी दीक्षांत सोहळ्याच्या आधी सर्व विभागांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाते. यामध्ये सर्व ५०४ संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा समावेश असतो. या गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व पारितोषिकांनी दीक्षांत सोहळ्यामध्ये गौरवण्यात येते.

हेही वाचा : ऑपरेशन अमानत… २.७८ कोटींचे साहित्‍य रेल्वे प्रवाशांना मिळाले परत !

विद्यापीठाकडे अनेक विषयांसाठी काही दानदात्यांनी सुवर्ण पदक व पारितोषिक दिलेले आहेत. यात जवळपास २९२ सुवर्ण पदके, ४३ रौप्य आणि १०२ पारितोषिकांचा समावेश असतो. मात्र, विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरातील पदव्युत्तर विभाग स्वायत्त झाल्याने येथील विद्यार्थ्यांचा या पदांसाठी तयार करण्यात येणाऱ्या गुणवत्ता यादीमध्ये समावेश होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड हिरमोड झाला आहे. विशेष म्हणजे, आजपर्यंताचा इतिहास बघता सर्वाधिक सुवर्ण पदक आणि पारितोषिक मिळवणाऱ्यांमध्ये शैक्षणिक परिसरातील विद्यार्थ्यांचा समोवश असायचा. मात्र, आता संलग्नित महाविद्यालयांनाच त्यात संधी मिळणार आहे.

हेही वाचा : नागपुरातील चिंचभवन रेल्वे उड्डाण पुलावरील वाहतूक पूर्ववत

सर्वाधिक गुण असूनही यादीत नाही

पदव्युत्तर मराठी विभागातील एका विद्यार्थ्याने सांगितले की, त्याला विद्यापीठातून सर्वाधिक गुण मिळाले आहेत. गुणवत्ता यादीनुसार तो चार सुवर्णपदकांचा मानकरी ठरतो. मात्र, विभाग स्वायत्त झाल्याने त्याचे नाव गुणवत्ता यादीत नाही. विभागाची स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा हिरमोड झाला आहे. अशी अवस्था अन्य विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांची असल्याचेही त्याने सांगितले.

हेही वाचा : ‘सखी’ ठरतेय संकटग्रस्त महिलांसाठी आधारवड! नेमकं कार्य काय? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“विभागांना संलग्नता देण्यात आल्याने त्यांची परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम सगळे वेगळे आहे. त्यामुळे त्यांचा संलग्नित महाविद्यालयांच्या गुणवत्ता यादीमध्ये समावेश करणे शक्य नाही. प्रत्येक विद्यापीठांमध्ये हीच पद्धती असते. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच शताब्दी वर्षानिमित्त प्रत्येक पदव्युत्तर शैक्षणिक विभागांसाठी सुवर्ण पदकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पदकांनी गौरव होणारच आहे.” – डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.