नागपूर : पहिल्या टप्प्यात नागपूरसह पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान पार पडले. गडचिरोलीत ७० टक्के तर नागपूरमध्ये फक्त ५४ टक्केच मतदान झाले. याचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावती येथील प्रचार सभेत केला. नागपूरला कमी झालेल्या मतदानाकडे त्यांनी लक्ष वेधले.

दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील अमरावती मतदारसंघासह पाच लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार असून त्याचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अमरावतीतील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी सोमवारी अमरावती येथे शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या. पवार यांनी या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. केंद्रात पुन्हा मोदीच्या नेतृत्वात सरकार आले तर संविधान बदलण्याचा धोका व्यक्त केला.

हेही वाचा : गोविंदा आला अन्…; ‘रोड शो’ने चिखलीतील रस्ते फुलले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाषण संपवत असताना पवार थांबले व म्हणाले “ मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघात मतदान झाले. नागपूरमध्ये ५४ टक्के तर आदिवासी जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ७० टक्के मतदान झाले. शहरी भागातील सुज्ञ नागरिकांचे मतदान कमी तर दुर्गम भागातील आदिवासींचा जिल्ह्यात मतदान अधिक. यातून आपल्याला काही शिकले पाहिजे. त्यामुळे अमरावतीत ८० टक्के मतदान व्हायला हवे. राज्यात महाविकास आघाडींच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करून त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे रक्षणासाठी दिल्लीत पाठवायचे आहे.”