यवतमाळ – वणी तालुक्यातील कायर येथे विदर्भ नदीवरील पुरात चारचाकी वाहन वाहून गेले. विदर्भ नदीवरील पुलावरून जात असताना पुराच्या जोरदार पाण्यामुळे चारचाकी प्रवासी वाहनाचा ताबा सुटून गाडी नदीत कोसळली. या दुर्घटनेत वाहनातील एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत रामा उध्दव कणाके (४०), रा. उमरी, ता. वणी यांचा मृत्यू झाला तर भास्कर संभाजी पुसाम (४३), रा. उमरी हे गंभीर जखमी झाले.

उमरी (ता. वणी) येथील भास्कर संभाजी पुसाम आणि रामा उध्दव कणाके हे दोघेजण मंगळवारी रात्री डोंगरगाव येथून परतत होते. दिवसभर पावसाची संततधार असल्याने विदर्भ नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. यावेळी रामा याने वाहन पुराच्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पुराच्या पाण्याचा जोर इतका होता की वाहनाचा ताबा सुटून गाडी नदीत कोसळून वाहून गेली. या दुर्घटनेत रामा कनाके याचा मृत्यू झाला असून भास्कर पुसाम गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, कायर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच मुकुटबन पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि मदत कार्य सुरू केले. मुकुटबन पोलीस स्टेशन व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध व बचाव कार्य पार पाडण्यात आले. आज रामा कनाकेचा मृतदेह सापडला. या अपघातात मॅजिक गाडी पूर्णतः नुकसानग्रस्त झाली असून ती रामा कनाके यांच्या मालकीची होती. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यात वाहन चालवू नये व पुराच्या परिस्थितीत प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यवतमाळात संततधार

मंगळवार सायंकाळपासून यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार आहे. ३१ मे पर्यंत पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यात सर्वदूर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. उमरखेड, वणी, राळेगाव, बाभूळगाव, मारेगाव, उमरखेड, महागाव, दारव्हा, यवतमाळ, आर्णी, पांढरकवडा, पुसद येथे पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक गावात घरांवरील टिनपत्रे उडाली. काही ठिकाणी झाडे कोसळली. लहान नाल्यांना पूर आल्याने वणी, उमरखेड तालुक्यात वाहतुकीवर परिणाम झाला. वणी तालुक्यात विदर्भ नदीला पूर आल्याने मोठे नुकसान झाले. या पावसाने जवळपास ५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.