एखाद्याचा पेहराव हे प्रगतीचे लक्षण म्हणून गृहीत धरायचे की वर्गव्यवस्थेचे प्रतीक म्हणून, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. मध्ययुगात कोण कुठल्या वर्गाचा प्रतिनिधी आहे हे पेहरावावरून ओळखले जायचे. तेव्हा बलुतेदारी पद्धत रूढ होती. नंतर जसजशी प्रगती होत गेली तसतसे पोशाखावरून माणूस ओळखण्याची प्रमाणे बदलत गेली. आता तर पोशाखही प्रगतीचे लक्षण म्हणून ओळखला जातो. भाजपचे नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना हे कदाचित ठाऊक नसावे किंवा त्यांची मानसिकता तरी मध्ययुगीन असावी. शेतकऱ्यांच्या संपावर भाष्य करताना अहिरांनी जे तारे तोडले, त्यावरून हा निष्कर्ष सहज काढता येतो. शेतकरी जिन्स पॅन्ट घालून आंदोलन करत आहेत हे या मंत्र्यांचे ताजे विधान अन्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. त्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांच्या पेहरावाची व्याख्याच नव्याने करावी लागेल असे दिसते. रापलेले हात, सुरकुत्या पडलेला चेहरा, उन्हात राबून काळे पडलेले तोंड, अंगावर धोतर व खमीज आणि डोक्याला मुंडासे असा दिसणारा तो शेतकरी अशी अहिरांची समजूत असावी. जिन्स पॅन्ट घातलेला, चांगला सदरा चढवलेला शेतकरी असूच शकत नाही ही या मंत्र्याची ठाम समजूत दिसते. त्यामुळे आता किमान शेतकऱ्यांनी तरी या आंदोलनाचा सच्चेपणा अहिरांना कळावा म्हणून मध्ययुगीन पेहराव करून त्यांच्यासमोर आंदोलन करावे, अन्यथा हे मंत्रीमहोदय आंदोलनाची खिल्ली उडवत राहतील. हे अहीर गेल्या अनेक वर्षांपासून खासदार आहेत. ते ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्यात शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे त्यांच्या विजयात शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न अहिरांना ठाऊक नाहीत, असेही नाही. कोळसा खाणीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना घसघशीत मोबदला मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने त्यांनी केली आहेत. त्यामुळे शेतकरी काय खातो, कसा राहतो, कोणते कपडे घालतो हे अहिरांना चांगले ठाऊक आहे. तरीही ते मंत्री होताच अशी भाषा वापरत असतील तर दोष त्यांचा नाही, सत्तेचा आहे असेच म्हणावे लागते. ही सत्तेची नशा अथवा झिंग भल्याभल्यांची मती कुंठित करून टाकते. सत्ता आली की नेत्यांची भाषा बदलते याचा अनुभव सध्या शेतकरी घेतच आहेत. त्यात आता या केंद्रीय मंत्र्याच्या आचरट विधानाची भर पडली आहे. हे वाक्य वापरून अहिरांना खरा शेतकरी आंदोलन करतच नाही हे सुचवायचे होते म्हणे! तसे त्यांनी बोलूनही दाखवले. हा आणखीच मोठा विनोद आहे. साऱ्या राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या प्रश्नावर केवळ शेतकरीच नाही तर संपूर्ण समाजच संवेदनशील झाल्याचे चित्र उघडपणे दिसते आहे. या आंदोलनातील शेतकऱ्यांचा सहभाग, सरकारी पातळीवर चालणाऱ्या हालचालींकडे अनेकांचे लक्ष आहे. या साऱ्या घडामोडी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यालाच ठाऊक नाही असे समजायचे काय? त्यांच्या मतदारसंघात कोण आंदोलनात आहे हे साऱ्यांना दिसत असताना अहिरांना यात शेतकऱ्यांऐवजी विरोधक दिसत असतील तर त्यांची शेतकऱ्यांविषयीची भूमिकाच बदलली आहे असे म्हणावे लागेल. खरे तर हे आंदोलन, स्वत: अहीर व भाजप सरकार यांचा अगदी जवळचा संबंध आहे. अहीर ज्या चंद्रपूर-आर्णी मतदारसंघातून निवडून येतात, त्याच क्षेत्रातील दाभाडी गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातील पहिली ‘चाय पे चर्चा’ २० मार्च २०१४ ला आयोजित केली गेली. शेतकऱ्यांसोबत चहा व चर्चा असे स्वरूप असलेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण भाजपने देशभर केले होते. याच चर्चेत मोदींनी उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा गृहीत धरून पिकांना हमीभाव दिले जातील, असे सर्वप्रथम जाहीर केले होते. याच सभेत त्यांनी अहिरांना मत देण्याचे आवाहनही केले होते. शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल अशा या घोषणेचे काय झाले, हा प्रश्न अहिरांना आता का पडत नाही? या घोषणेच्या पूर्ततेसाठी ते सरकार किंवा पक्षाच्या पातळीवर लढत आहेत असेही गेल्या तीन वर्षांत कधी दिसले नाही. ही घोषणा पूर्ण करू शकलो नाही म्हणून शेतकऱ्यांची क्षमाही अहिरांनी आजवर मागितली नाही आणि आता तेच अहीर दाभाडीचा चहा विसरून अगदी बेरकीपणे शेतकऱ्यांच्या पेहरावावर भाष्य करतात, हीच मुळात चीड आणणारी बाब आहे. निवडणुकीतील आश्वासने विसरण्यासाठीच असतात हे गृहीत धरले तरी अहिरांना दाभाडी विसरण्याचा नैतिक अधिकार सुद्धा नाही. शेतकऱ्यांच्या पेहरावाचा उल्लेख करताना याच अहिरांनी हे सरकार शेतकऱ्यांचा विचार करणारे आहे. कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे, अशी विधाने केली पण हमीभावाचे काय, तेच सांगितले नाही. शेतकऱ्यांच्या संपात विरोधक शिरले आहेत व तेच जिन्स पॅन्ट घालून आहेत असे म्हणणारे हे मंत्री विरोधात असताना काय करायचे? तेव्हाही समाजातले घटक आंदोलन करायचे तेव्हा पाठिंबा देणारे अहीरच असायचे. लोकशाहीत विरोधकाचे ते कामच आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर चिंता व्यक्त करण्याऐवजी त्यांचा पेहराव काढणाऱ्या अहिरांना जिन्स पॅन्टचे महत्त्व तरी माहिती आहे का? शेतकऱ्यांचे प्रणेते शरद जोशी यांनी आयुष्यभर हाच पॅन्ट जाणीवपूर्वक परिधान केला. जिन्स हे स्वदेशीची प्रेरणा देणारे कापड आहे असे जोशी सांगायचे. आजही अनेक शेतकरी शेतात राबताना सुद्धा हा पॅन्ट वापरतात. शारीरिक कष्ट करताना उत्तम पेहराव कोणता असेल तर तो हाच, अशी त्यामागील भावना असते. हे सर्व व्यवहारज्ञान मंत्रीपदावर पोहचलेल्या एका ज्येष्ठाला कळू नये हे अतिच झाले! याच अहिरांचे पट्टशिष्य असलेले गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी काही दिवसांपूर्वी यवतमाळात बोलताना कर्जमाफी दिली तर शेतकरी आळशी होईल असे विधान केले होते. विदर्भातील शेतकरी आधीच आळशी आहेत, त्याला आणखी आळशी करू नका, असे तारे तोडणाऱ्या या खासदाराला आळशी माणूस आत्महत्या का करतो, असा प्रश्न विचारायला हवा. सत्ता ही कायमस्वरूपी नसते. ती कधी येते तर कधी जाते, हे वास्तव अहीर व त्यांच्या शिष्याला कळत नाही अशातला भाग नाही. तरीही ते अशी विधाने करत असतील तर सत्तेच्या डौलात त्यांना वास्तवाचा विसर पडला आहे, हे गृहराज्यमंत्री म्हणूनही अतिशय सुमार कामगिरी बजावणाऱ्या अहिरांना कुणीतरी सांगायला हवे.

devendra.gawande@expressindia.com