अकोला : कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अत्यंत महत्त्व आहे. सध्या देशात कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानावर आधारित ४७ टक्के यांत्रिकीकरण झाले आहे. आगामी २०४७ पर्यंत देशातील ७५ टक्के कृषी क्षेत्र यांत्रिकीकरणाचे लक्ष्य असल्याची माहिती नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (कृषी अभियांत्रिकी) डॉ. एस. एन. झा यांनी दिली. योजना अंमलबजावणीच्या उदासिनतेमुळे महाराष्ट्र राज्य यांत्रिकीकरणामध्ये पिछाडीवर पडल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आले असता त्यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. यावेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. एस.आर. काळबांडे, डॉ. किशोर बिडवे आदी उपस्थित होते. बदलते हवामान, कृषी क्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता आदी आव्हाने लक्षात तंत्रज्ञान महत्त्व डॉ. झा यांनी अधोरेखित केले.

हेही वाचा…शेतीचा हंगामाच्‍या अखेरीस शेतमालाच्‍या किमतीत वाढ, शेतकऱ्यांना होईल का लाभ?

पुढे एस. एन. झा म्हणाले, ‘तंत्रज्ञानाने कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल आणले आहेत. शेती तंत्रज्ञानावर आधारित राहिल्यास ती फायद्याची होऊ शकते. तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकऱ्यांच्या विचारात देखील बदल होऊ शकतो. तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अधिकाधिक उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना तज्ज्ञ अभियंत्यांचे योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. प्रत्येक ठिकाणी अभियंते नियुक्त असायला हवे.’

केंद्र सरकारने शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. कोट्यवधींचा निधी त्यावर खर्च केला. आज यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, योग्य प्रशिक्षणाअभावी त्याचा प्रभावी वापर होत नाही. तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची आवश्यक आहे, असे डॉ. झा म्हणाले.

हेही वाचा…बुलढाणा : यंदाचा महिला दिन सहा दशकांची ‘कोंडी’ फोडणार?, १९५७ पासून लोकसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारीच नाही

जागतिक पातळीवर अनेक प्रगत देशात यांत्रिकीकरणातून शेती होते. त्यामध्ये मानवी सहभाग हा नगण्य असतो. भारतात सद्यपरिस्थितीत तंत्रज्ञानावर आधारित ४७ टक्के शेती केली जाते. २०४७ पर्यंत त्याचे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. देशातील अनेक राज्यात विकसित तंत्रज्ञान असून शेतीच्या यांत्रिकीकरणावर भर दिला जात आहे. पंजाब, तामिळनाडू, बिहार किंबहुना ओडिशा सारख्या राज्यातही कृषी क्षेत्रात विकसित तंत्रज्ञान आहे. महाराष्ट्र त्याबाबतीत मागे पडला. योजना प्रभावीपणे राबवून त्याची अंमलबजावणी व्हावी व इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पंजाबमधील शेतकरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत जागृत असल्याचे देखील ते म्हणाले.

हेही वाचा…शेतीचा हंगामाच्‍या अखेरीस शेतमालाच्‍या किमतीत वाढ, शेतकऱ्यांना होईल का लाभ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामानातील बदलावर तंत्रज्ञान उपयुक्त

हवामानातील बदलाचा कृषी क्षेत्रावर विपरित परिणाम होत आहे. अतिवृष्टी, अल्पवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन बळीराजाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. यावर तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. ‘सोलर ड्रायर’च्या माध्यमातून अतिवृष्टी झाल्यावर जमीन सुकवता येते. तंत्रज्ञानावर तापमान देखील नियंत्रित ठेऊ शकतो. विपरित हवामानात सुद्धा तंत्रज्ञानामुळेच उत्पादनावर परिणाम झालेला नाही, असा दावा डॉ. झा यांनी केला. सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचण्यासाठी यंत्रसामुग्रीची उत्पादकता वाढण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.