केंद्रीय गृह विभागाचा अहवाल; मुंबई, पुण्यात सर्वाधिक गुन्हे दाखल

अनिल कांबळे

महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि अन्य प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत असून महिलांच्या विरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांत महाराष्ट्र राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असल्याची नोंद केंद्रीय गृह विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. महिलांबाबतचे सर्वाधिक गुन्हे मुंबई आणि पुणे शहरात दाखल झाल्याची माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे.

अहवालातील आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये देशातील महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०२१ मध्ये एकूण ४ लाख २८ हजार गुन्हे नोंदवले गेले. त्यापैकी उत्तर प्रदेशात सर्वाधिक ५ लाख ६० हजार, त्यानंतर राजस्थान ४ लाख ७३८ आणि महाराष्ट्रात ३ लाख ९५ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. सरासरी पाहता महाराष्ट्रात दररोज ११२ महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटनांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. देशातील महानगरांच्या गुन्हेगारी अहवालावर नजर टाकल्यास देशाची राजधानी दिल्ली शहरात सर्वाधिक ३ हजार ९४८ महिलांबाबतच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मुंबईत ११०० आणि बेंगळुरूमध्ये ५७८ गुन्ह्यांची नोंद झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.२०२३ जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यांतही जवळपास १२ टक्क्यांनी गुह्यांत वाढ झाल्याची नोंद पोलीस विभागाकडे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होणे ही चिंतनीय बाब आहे. महिलांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्याठी महिला आयोगाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. – आभा पांडे, सदस्य, राज्य महिला आयोग.