नागपूर: राज्यातील हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. महसूल विभागाने राज्यात १७०० पेक्षा जास्त तलाठी पदे लवकरच भरून काढण्याचा निर्णय घेतला असून, या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याचे शासनाच्या निर्णयानुसार, जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे. आणि त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

तलाठी पदांची भरती लवकरच होणार असली तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक निराशा जनक बातमी आहे. महसूल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये करुन त्यांना मानधनाऐवजी वेतनश्रेणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल सेवकांची मागणी होती. याबाबत महसूलमंत्र्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.

वेतनश्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्दावर सकारात्मक चर्चा झाली. महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासनही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. त्यानुसार गुरुवारी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणी लागू करण्याबाबत तरतूद नसल्याचा मुद्दा चर्चेला आला.

त्यामुळे त्याला पर्यायी व्यवस्था करण्यासाठी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी संदर्भात माहिती दिली. महसूलमंत्र्यांनी महसूल सेवकांना वेतन श्रेणी देता येत नसली तरी त्यांच्या सेवेचा आणि अनुभवाचा विचार करुन त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवण्याचा मुद्दा मांडला. त्याबरोबरच ज्यांना पाच वर्षांचा महसूल सेवकाचा अनुभव आहे. त्यांना २५ गुण अतिरिक्त देण्याच्या मुद्दावरही चर्चा झाली. याबाबत अधिकाऱ्यांनीही सकारात्मकता दर्शविली असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

महसूल सेवकांना यापूर्वीच मानधन वाढ देण्यात आली आहे. त्याबरोबरच त्यांच्या प्रश्नांना सरकार कायम प्राधान्य देत असते. सध्या ऑनलाईन पद्धतीने सर्व सेवा देण्यात येत असल्याने महसूल सेवकांचे बरेच काम कमी झाले आहे. पूरस्थितीच्या काळात अनेक महसूलसेवक संपावर होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. याचाही महसूल सेवकांनी विचार करायला हवा, अशीही चर्चा झाली.

तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शक आणि जलदगतीने व्हावी यासाठी महसूल विभाग विशेष प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांना याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. नियुक्ती प्रक्रियेत कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून शासनाकडून दक्षता घेतली जात आहे. या निर्णयामुळे शासकीय सेवेत जाण्याची स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांना दिलासा मिळणार आहे. तसेच, रिक्त पदांमुळे महसूल प्रशासनात निर्माण झालेली अडचणही दूर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे.