नागपूर: शहरातील विविध भागातील तीन हजाराहून अधिक पदपथ हे चालण्यायोग्य स्थितीत नाही, त्यावर चार हजाराहून अधिक फुटकळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असे सिव्हीक ॲक्शन ग्रुपने (कॅग) केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.

कोट्यवधींचा खर्च करून बांधण्यात आलेले पदपथ नागरिकांना चालण्यासाठी असले तरी प्रत्यक्षात त्याचा वापर फेरीवाले, छोटे दुकानदार, भाजीवाले करतात. यासंदर्भात सिव्हीक ॲक्शन ग्रुप (कॅग)ने शहरातील विविध भागाचे सर्वेक्षण करून सत्यस्थिती पुढे आणली. शहरात पादचाऱ्यांसाठी महापालिका, नागपूर सुधार प्रन्यासने विविध भागात ३०० किमी पदपथ बांधले. त्यातील ७० टक्के पदपथावर अतिक्रमण झाले आहे. बाजारपेठा असलेल्या भागात ९० टक्के पदपथ छोट्या विक्रेत्यांनी व्यापले.

हेही वाचा… अकोला: धक्कादायक! हत्येपूर्वी तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वाधिक अतिक्रमण पूर्व आणि मध्य नागपुरात आहे. त्यानंतरचा क्रम दक्षिण पश्चिम आणि पश्चिम नागपुरातील वस्त्यांचा आहे. नागपुरात अतिक्रमणांची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. फेरीवाल्यांवर कारवाई केल्यावर ते पुन्हा त्याच जागेवर येतात. ‘व्हीआयपी’च्या दौऱ्याच्या वेळी त्यांना तात्पुरते हटवले जाते. महापालिका आणि पोलिसांनी खमकेपणा दाखवला तर येथे एकही फेरीवाला बसू शकणार नाही. पण, तसे होत नाही. फेरीवाले आणि पालिकेचे अधिकारी यांच्यात जणू काही करार झालेला असावा, असा हा खेळ वर्षानुवर्षे सुरू आहे, असा आरोप कॅगने केला आहे. प्रशासनाने याबाबत धोरण निश्चित करावे असे सिव्हीक ॲक्शन ग्रुप (कॅग)चे विवेक रानडे म्हणाले.