वर्धा, स्थानिक पातळीवरील कलाकारांनी आपल्या गुणांनी राज्य पातळीवर गाजलेल्या कलाकारांना टक्कर द्यावी, हे तसे धाडसाचेच. चित्रपट सृष्टीत तर ही बाब नवलपरीची. मात्र असा इतिहास घडला आहे. मातब्बर चित्रपट संस्थांशी टक्कर देत  ‘ तेरवं ‘ या चित्रपटाने ही कामगिरी केली आहे. ६१  व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीची नामांकनांची घोषणा झाली असून वर्धा येथील नाट्य-सिने दिग्दर्शक हरिष इथापे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘तेरवं’ चित्रपटाला सहा नामांकने मिळाली आहेत. 

‘तेरवं’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट पटकथा, उत्कृष्ट संगीत, उत्कृष्ट पार्श्वसंगीत, उत्कृष्ट अभिनेत्री, प्रथम पदार्पण दिग्दर्शन विभागांत नामनिर्देशित करण्यात आले आहे. यासंदर्भातील घोषणा सांस्कतिक मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई येथे केली. शेतकरी आत्महत्येनंतर शेतकरी कुटुंबांची होणारी फरपट, कुटुंबातील महिलेचा संघर्ष, यंत्रणेची असंवेदनशीलता, शेती आणि शेतक-यांच्या मूळ समस्या, ग्रामीण भागातील सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थिती याची सुक्ष्म निरीक्षणे या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे आली आहेत.

शेतकरी कुटुंबातील नायिकेचा संघर्ष आणि इतर विधवा महिलांना तिने दिलेले लढण्याचे बळ ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. ‘रडणार नाही, तर लढणार’, हा संदेश या चित्रपटांतून शेतकरी नायिका देते. ‘तेरवं’ला इतर नऊ चित्रपटांसह सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या अंतिम फेरीत निवडण्यात आले आहे. यासोबतच या चित्रपटाला उत्कृष्ट पटकथा (श्याम पेठकर), उत्कृष्ट संगीत (वीरेंद्र लाटणकर), उत्कृष्ट पार्श्वसंगीत (वीरेंद्र लाटणकर), उत्कृष्ट अभिनेत्री (किरण खोजे) आणि प्रथम पदार्पण दिग्दर्शन विभागात हरिष इथापे यांना नामांकन देण्यात आले आहे.

‘तेरवं’चे चित्रिकरण वर्धा, यवतमाळ व विदर्भातील इतर स्थळांवर झाले आहे, हे विशेष. सोबतच दोन प्रमुख कलाकार वगळता बहुतांश कलाकार हे वर्धा आणि विदर्भातील आहेत. या चित्रपटाला, दिग्दर्शक हरिष इथापे आणि पटकथा लेखक श्याम पेठकर यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती अंजनीकृपा प्राँडक्शन प्रा. लि.ची असून, निर्माते नरेंद्र जिचकार (नागपूर) आहेत. छाया दिग्दर्शक सुरेश देशमाने (मुंबई), तर प्रमुख कलाकार किरण खोजे, संदीप पाठक, किरण माने आणि नेहा दंडाळे आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तेरवं’ला सहा नामांकने मिळाल्याचे कळताच दिग्दर्शक, निर्माते यांच्यासह सर्व कलाकारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिग्दर्शक हरीश इथापे हे म्हणतात की या क्षेत्रात प्रथम पदार्पण असून याच श्रेणीत नामांकन मिळाले, हे विशेष. वैदर्भीय मातीतून फुललेले हे रोपटं आहे. त्याची रसिकांनी व आता शासनाने दखल घेण्याची बाब हुरूप वाढविणारी आहे.