नागपूर : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर परिसरात २५ जून च्या संध्याकाळ पासून सुरु झालेल्या पावसाचा फटका समृद्धी महामार्गालाही बसला. मेहकर जवळून जाणाऱ्या समृद्धीच्या पुलाखाली राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने व रस्त्यावरून नदी सारखा प्रवाह वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेबाबत समृद्धी महामार्ग प्रशासनाने महत्वाची माहिती दिली आहे.
हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गचे (समृद्धी महामार्ग) अधिक्षक अभियंता तथा प्रकल्प संचालक, शिबीर कार्यालय अमरावती यांनी या घटनेबाबत स्पष्टिकरण दिले आहे. त्यानुसार समृद्धीवरील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे पाणी साचलेबाबतची सद्यस्थिती पुढे आली आहे. त्यानुसार समृध्दी महामार्ग व खामगाव कडून मेहकरकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ सी, समृध्दी महामार्गास मेहकर इंटरचेंज येथे मिळतो.
राष्ट्रीय महामार्ग हा समृध्दी महामार्गाच्या खालून जातो. समृध्दी महामार्ग हा वरच्या भागास आहे. २५ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजतापासून २६ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजतापर्यंत येथे सतत पाऊस पडून अतिवृष्टी झाली. या काळात येथे साधारणत: १०७ मीमी (अंदाजे) पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे खामगावकडून मेहकरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरची साधारणतः २०० मीटर लांबी १ ते दीड तास पाण्याखाली होती.
राष्ट्रीय महामार्गाकडून समृध्दी महामार्गास जोडणाऱ्या रॅम्पवर पाणी आलेले होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक एक ते दीड तास प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी बंद करण्यात आलेली होती. त्यानंतर प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्गावरील मेहकर इंटरचेंज येथील पाणी निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळेच एक ते दीड तासातच या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यात आली. समृध्दी महामार्गाच्या ‘मेन कॅरेज वे’वर कोठेही पाणी आलेले नव्हते.
प्रकरण काय ?
बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला सुद्धा पावसाचा फटका बसला. मेहेकर येथील इंटरचेंज टोल नाक्यावर जाण्यासाठी रस्ता पाण्याखाली गेला असून त्याला अक्षरशः नदीचे रूप आले होते. समृद्धी वर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनाना मेहकर मध्ये चढण्यासाठी वा उतरण्यासाठी मेहकर इंटरचेंजचा वापर करण्यात येतो. मात्र त्याच रस्त्यावर मुसळधार पावसाने नदी सदृश्य पाण्याचा प्रवाह वाहायला लागला असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. बरेच तास हा मार्ग पाण्याखाली गेला आहे. दरम्यान काहींनी या महामार्गावर नदी सदृष्य पाण्याचा प्रवास वाहत असल्याचे चलचित्र काढून समाज माध्यमांवर टाकले. तो खूप व्हायरलही झाला.