यवतमाळ : क्षुल्लक कारणांवरून एसटी कर्मचाऱ्यांना मारहाण होत असल्याच्या घटना सध्या महाराष्ट्रात घडत आहेत. काही प्रकरणात प्रवाश्यांकडून यात मध्यस्थी किंवा बचावासाठी पुढाकार घेतल्या जात आहे, तर कुठे या वादाचा सामना एसटी कर्मचाऱ्यांना स्वत: करावा लागतो आहे.
गेल्या आठवड्यात यवतमाळ ते अमरावती जात असलेल्या एसटी चालकाने हॉर्न का वाजविला म्हणून बसला रस्त्यात अडवून चार तरुणांच्या टोळक्याने वाहकाला मारहाण केली. नुकतीच जालना ते संभाजीनगर जात असलेल्या एसटी मधील वाहकाला फुकट प्रवास करू देत नसल्याच्या कारणावरून मारहाण झाली आहे. गेल्याच आठवड्यात सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यात सुट्ट्या पैशांच्या वादातून महिला प्रवाशाने महिला वाहकास मारहाण केली. या सर्व घटना समाज माध्यमांवर चांगल्याच व्हायरल होत आहे. अशा प्रकारांना रोखण्यासाठी विशेष कायदा अस्तित्वात यावा, जेणेकरून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळेल, अशी मागणी जोर धरत आहे.
काही दिवसांपूर्वी यवतमाळ ते अमरावती मार्गावर वटफळी येथून जात एसटी बसला हॉर्न का वाजविला या क्षुल्लक कारणावरून चार तरुणांनी रोखले. त्यांनंतर एसटी बसमध्ये शिरून वाहकावर हल्ला चढविला. ही घटना ४ जून रोजी नेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हा सर्व घटनाक्रम समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणात जग्गू मेश्राम, तेजस राठोड, हर्षल बनकर आणि शुभम जगताप या चौघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे नेर पोलिसांनी सांगितले. परंतु,अशा प्रकारचे हल्ले परत होणार नाही, यासाठी प्रशासनाने गंभीर पावले उचलावी आणि कायद्यात ठोस तरतूद केली जावी, अशी मागणी राज्य मार्ग परिवहन महामंडळातील चालक, वाहकांनी केली आहे.
नेर येथे चार तरुणांनी भर रस्त्यात एसटी बस अडवून चेहऱ्यावर प्रचंड हिंसा आणि अश्लील शिवीगाळ करत वाहकाला मारहाण केली. वाहकानेही आपल्या बचावासाठी त्यांचा हल्ला धुडकावून लावला. वाहक विरुद्ध युवकांची टोळी अशा या वादात मात्र एकाही प्रवाशाने मध्यस्थी घडवून आणली नाही. अशा घटनांमुळे सामाजिक स्वास्थ धोक्यात येत आहे. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी पोलिसांनी यातील दोषींना कठोर शासन करावे, अशी मागणी पुढे येत आहे.
राग व्यक्त करण्यासाठी एसटीच दिसते का ?
कारण कोणतेही असो त्यात एसटी महामंडळाचा कुठलाही संबंध नसताना लोकांना राग व्यक्त करण्यासाठी एसटी बसच दिसते का, असा सवाल महामंडळ कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. आंदोलन, मोर्चा, निषेध नोंदविण्यासाठी एसटीची जाळपोळ किंवा तोडफोड केली जाते. आतातर थेट एसटी कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आहे. कर्मचारी सुरक्षिततेसाठी शासनाने ठोस पावले उचलावी, अशी मागणी होत आहे.
‘त्या’ घटनेनुसार कारवाईची गरज
गत वर्षीच्या एका घटनेत एसटी चालकाला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी एका खासगी वाहन चालकाला न्यायालयाने चांगलाच दणका दिला. ही घटना जालना ते संभाजीनगर मार्गावर घडली. या प्रकरणात संभाजीनगर न्यायालयाने जामीन मंजूर करण्यासाठी मारहाण करणाऱ्या खासगी कार चालकाला एक लाखाचा दंड ठोठावला होता. हे पैसे न्यायालयाच्या आदेशाने राज्य परिवहन महामंडळाच्या खात्यात जमा करण्यात आले होते. या प्रकरणात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपली एकजूट दाखविल्याने त्यांनी समाजविघातक कृत्ये करणाऱ्यांना न्यायालयीन लढाईने अद्दल घडविली आहे. आताही वाढते हल्ले रोखण्यासाठी एसटीच्या विविध संघटनांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त होत आहे.