scorecardresearch

वेळेचीही ‘समृद्धी’! नागपूर-शिर्डी अंतर तब्बल १०२ किलोमीटरने कमी; आजपासून नागपूर-औरंगाबाद बसही धावणार

नागपूर-औरंगाबाददरम्यान पूर्वी एसटीला ४७९ किलोमीटर प्रवास करावा लागत होता. परंतु आता हे अंतर ५०.९ किलोमीटरने कमी होणार आहे.

वेळेचीही ‘समृद्धी’! नागपूर-शिर्डी अंतर तब्बल १०२ किलोमीटरने कमी; आजपासून नागपूर-औरंगाबाद बसही धावणार
समृद्धी महामार्गावर आजपासून नागपूर-औरंगाबाद बसही धावणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर-शिर्डी दरम्यान समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबरला उद्घाटन केल्यावर एसटीने या मार्गाने बस चालवण्याची घोषणा केली होती. या मार्गासह आता नागपूर-औरंगाबादही (मार्गे जालना) एसटी धावणार आहे. समृद्धीमुळे नागपूर-शिर्डी दरम्यानचे एसटीचे अंतर १०२ किलोमीटरने तर औरंगाबाद अंतर ५०.९ किलोमीटरने कमी होणार आहे.

हेही वाचा- नागपूर : युवकांनी सिग्नल तोडत वाहतूक पोलिसाच्या अंगावरच घातली गाडी

नागपूर-शिर्डी दरम्यान एसटीची सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वीपर्यंत बस धावत होती. मात्र, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादासह इतर कारणांनी ही सेवा बंद पडली. आता पंतप्रधानांनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केल्यावर पुन्हा नागपूर-शिर्डी दरम्यान विनावातानुकूलित बससेवा १५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या बसमध्ये ५० बैठक असलेली आसने आणि १५ शयनयान असलेली आसने असणार आहे. नागपूर-शिर्डी दरम्यान गैरसमृद्धी महामार्गाने धावणाऱ्या एसटीला सव्वासहाशेच्या दरम्यान अंतर धावावे लागत होते. समृद्धी महामार्गामुळे हे अंतर ५२० किलोमीटरवर आले आहे. त्यामुळे एसटीचे तब्बल १०२ किलोमीटरने अंतर कमी होणार आहे. ‘समृद्धी’ने एसटी प्रवास केल्यास प्रवासाचे ४.१५ तास वाचणार आहे. तर एसटीने आता नागपूर-औरंगाबाद दरम्यानही समृद्धीवरून बस चालवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. नागपूर-औरंगाबाददरम्यान पूर्वी एसटीला ४७९ किलोमीटर प्रवास करावा लागत होता. परंतु आता हे अंतर ५०.९ किलोमीटरने कमी होणार आहे. नागपूर-औरंगाबाद दरम्यानची बस शयनयान आहे.

हेही वाचा- गोसीखुर्द प्रकल्प आणखी रखडणार; उजव्या कालव्यावरील प्रकल्पाचा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाकडे प्रलंबित

प्रवास भाडे असे….

नागपूर-शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ९ वाजता बस सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता गंतव्य ठिकाणी पोहोचेल. या बससेवेसाठी प्रतिप्रौढ व्यक्ती १,३०० व मुलांसाठी ६७० रुपये प्रवासभाडे असेल. नागपूर-औरंगाबाद (मार्गे जालना) या मार्गावर शयन आसनी बस दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री १० वाजता सुटेल. ही बस जालनामार्गे पहाटे ५.३० वाजता गंतव्य स्थळी पोहचेल. या प्रवासासाठी प्रतिव्यक्ती १,१०० रुपये प्रौढांना व ५७५ रुपये मुलांसाठी आकारले जाईल. नागपूर ते जालना दरम्यान प्रतिव्यक्ती ९४५ रुपये व मुलांसाठी ५०५ रुपये आकारले जाईल.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-12-2022 at 10:10 IST
ताज्या बातम्या