नागपूर : दीपावली निमित्त फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरातल्या विविध भागांमध्ये गेल्या २४ तासांत आगीने १९ हून अधिक ठिकाणी तांडव घातला. महानगर पालिकेच्या अग्निशामक विभागाने आगीची सूचना मिळताच घटनास्थळी धाव घेतल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आगीची सर्वांत भीषण घटना लक्ष्मीनगरातल्या आठ रस्ता चौकातील अंबानी समूहाच्या रिलायन्स मार्ट किराणा दुकानात घडली.
लक्ष्मी पुजनानिमित्त शहरात आतषबाजीला उधाण आले असताना रात्री सव्वा नऊच्या सुमारास एक रॉकेट रिलायंन्स मार्टच्या अंगणातील झाडावर जाऊन अडकले. पाहता पाहता झाडाच्या फांदीने पेट घेतल्यानंतर त्यातून निघालेल्या ठिणग्या रिलायंस मार्टवरच्या बॅनरवर पडल्या. प्लास्टिकच्या बॅनरने पेट घेतल्याने वितळलेले प्लास्टिक खाली पडलेल्या रिकामी कागदी डब्यांवर पडले.
शेजारीच रिलायन्स मार्टमधील रिकामे पोतेही पडलेले असल्याने आग भडकण्यासाठी ठिणग्यांना इंधन मिळाले. पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण केले. १० मिनिटांच्या आत आगीच्या ज्वाळांमुळे रिलायंस मार्टमधील प्लास्टिकचे साहित्य आणि धान्याने पेट घेतला.
रिलायन्स मार्ट आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक विभागाला लोखंडी शटर कापून मोठी कसरत करावी लागली. त्यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी पाच तास लागले. सुयोग पॅलेसमधील सर्वच्या सर्व २४ सदनीकांमधील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. आग भडकली असताना रिलायन्स मार्टमधील ८ कर्मचारी रोजचा हिशेब घेऊन स्टॉकच्या नोंदी घेत होते. आग भडकल्याची कल्पनाही त्यांना नसल्याने ते आत अडकले. अग्निशामक विभागाला याची माहिती मिळताच, पथकाने तिकडे धाव घेत आठ जणांची रात्री सव्वा दहाच्या सुमारास सुटका केली.
दुसर्या दिवशीही आगीचे कॉल
लक्ष्मीपूजनाच्या दुसर्या दिवशी बुधवारी शहरात फटाक्यांमुळे बहिरामजी टाउन आणि मानेवाडात आगीच्या दोन घटना घडल्या. बहिरमजी टाउन येथील दुसर्या माळ्यावरील आयकॅड शिकवणी वर्गात फटाक्यांची ठिणगी पडदे आणि टेबलवर पडल्याने आगीचा भडका उडाला. यात शिकवणी वर्गातील लाकडी साहित्याची होळी झाली. सूचना मिळताच सिव्हिल लाइन्स येथून २ आणि सुगत नगरातून अग्निशामक विभागाचे बंब घटनास्थळी धावले.
आगीची दुसरी घटना बुधवारी मानेवाडातल्या अलंकार नगरात घडली. मंगळवारी फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या बहुतांश घटना सक्कदरा, सुगतनगर आणि कॉटनमार्केट परिमंडळात घडल्या. माहिती मिळताच महानगर पालिकेच्या अग्निशामक विभागाचे बंब घटनास्थळी धावल्याने सुदैवाने आगीत होरपळून दगावण्याची एकही घटना घडल्याची नोंद झाली नाही.