नागपूर : राज्यात सध्या सुरू असलेला ओबीसी विरुद्ध मराठा वाद हा सरकार प्रायोजित असून यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक अशांततेमुळे ५० हजारांहून अधिक छोटे-मोठे उद्योग राज्याबाहेर गेले आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

नागपुरात २८ डिसेंबरला होणाऱ्या काँग्रेसच्या जाहीर सभेच्या निमित्ताने पटोले नागपुरात आहेत. त्यांनी मंगळवारी सांयकाळी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. पटोले म्हणाले, राज्यातील महायुती सरकार निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडून अशांतता निर्माण झाली आहे. त्याचा फटका उद्याोग जगताला बसला असून ५० हजारांहून अधिक छोटे-मोठे उद्याोग राज्याबाहेर गेले आहेत. ‘फोडा आणि राज्य करा’ हे भाजपचे धोरण आहे, त्यासाठी दोन समाजात दरी निर्माण केली जात आहे. मात्र त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी महाराष्ट्राची सामाजिक वीण ही इतकी घट्ट आहे की ती उसवणार नाही. सरकारला हा वाद मिटवायचा असेल तर त्यांनी जात निहाय जनगणना करावी, मात्र ती का केली जात नाही, असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा >>>खासदार रामदास तडस म्हणतात,’ बचत गट भवन हे’ या ‘ आमदाराचं देणं…’

नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आम्ही जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची उत्तरे सरकारकडून मिळाली नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले भाषण हे पावसाळी अधिवेशनात केलेलेच भाषण होते. मराठा आरक्षणावरील त्यांचे भाषण हे भाजपने लिहून दिलेली ‘स्क्रीप्ट’ होती, असा आरोपही पटोले यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका खासगी संस्थेने केलेल्या मतदानपूर्व जनमत चाचणीत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र त्याही पेक्षा जास्त जागा आघाडीला मिळतील. नागपूरची जाहीर सभा झाल्यावर वातावरण बदलेल. आघाडीत गुणवत्तेच्या आधारावर जागा वाटप केले जाईल. प्रकाश आंबेडकर यांचा आघाडीत समावेश करण्याबद्दल दिल्लीतील नेते निर्णय घेतली, असे पटोले म्हणाले.यावेळी माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, आ.वजाहत मिर्झा, प्रमोद मोरे आणि प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.