अकोला: भाजपने आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ता मिळवली. मराठा समाजासह अनेकांना त्यांनी आरक्षणाचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात पाळले नाही. केंद्रात व राज्यात सत्ता असतांना आरक्षणाच्या मुद्द्याला हात न लावता राज्य व देश लूटला. देशाला विकून सत्ता चालवली जात आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी येथे केली.

अकोल्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तरुण आता आरक्षणाच्या प्रश्नात गुंतला. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बिघडली. महाराष्ट्र सरकारला आव्हान दिले जात आहे. ही सर्व परिस्थिती भयावह आहे. त्यामुळेच काँग्रेस नेते राहुल गांधींनी संवैधानिक व्यवस्थेमध्ये जातीनिहाय जनगणनेची भूमिका स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीब जात असल्याचे म्हटले. भाजपला गरीब व श्रीमंत या दोन जाती निर्माण करायच्या आहेत का? असा सवाल करीत यावर भाजपने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आ. नाना पटोले यांनी केली. राज्यात काँग्रेसने मराठा व मुस्लिमांना आरक्षण दिले होते. मात्र, देवेंद्र फडणवीसांना ते टिकवता आले नाही, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा… “उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे”, सुधीर मुनगंटीवारांची मागणी

राज्य सरकारने विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना दिले. मात्र, अद्यापपर्यंत कुठलीही मदत शेतकऱ्यांना दिली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून त्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस आलेत. सरकारचे अंतिम दिवस सुरू झाले आहेत. आगामी काळात देशात व राज्यात परिवर्तन घडेल, असा दावा पटोले यांनी केला.

हेही वाचा… वाघ शिकार प्रकरणात सहा आराेपींना अटक

बेरोजगारी, महागाईचे मोठे मुद्दे आहेत. त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. तरुणांचे आयुष्य बरबाद करण्याचे काम अंमली पदार्थांच्या माध्यमातून राज्यात झाले. महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला पाठविण्याचा घाट सुरू आहे. महाराष्ट्राला लुटून गुजरातला देण्याचे काम सरकार करीत आहे. हे सर्व मुद्दे काँग्रेस जनतेपुढे मांडणार आहे. आगामी पंधरवाड्यात राज्यात आंदोलन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.

ॲड. आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी सकारात्मक, मात्र प्रस्तावच नाही

ॲड. प्रकाश आंबेडकरांना काँग्रेससोबत घेण्यासाठी आमची सकारात्मक भूमिका आहे. मात्र, त्यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. केवळ प्रसारमाध्यमांमधून चर्चा घडत आहे, असे पटोले म्हणाले. आम्ही जास्त काळ वाट पाहू शकत नाही. निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे अनेक उमेदवार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसचा खासदार निवडून येईल, असा दावा देखील त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी मदन भरगड व डॉ. अभय पाटील यांच्यातील वादाप्रकरणी दोन्ही नेत्यांना येत्या दोन दिवसांत नोटीस बजावली जाईल. पक्षात बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. कितीही मोठा नेता असला तरी कारवाई करू, असे पटोलेंनी स्पष्ट केले.