नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी पथकर नियमांमध्ये मोठा बदल करण्याचा घोषणा केली. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. देशातील राष्ट्रीय महामार्गांवरून वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. सरकार आता खाजगी वाहनांसाठी फास्टॅग आधारित वार्षिक पास जारी करणार असल्याची माहिती गडकरींनी बुधवारी ट्विटरद्वारे दिली. या पासची किंमत तीन हजार रुपये असेल. येत्या १५ ऑगस्टपासून ही पास प्रणाली सुरू होईल. या पासमुळे खाजगी वाहन मालकांना राष्ट्रीय महामार्गांवर कमी खर्चात आणि त्रासमुक्त प्रवास करता येणार आहे. गडकरींनी गुरुवारी पुन्हा एकदा एक ट्विट करत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. यात त्यांनी दुचाकी वाहनांवर पथकर लागणार की नाही?, याबाबत सविस्तर सांगितले आहे. 

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना, वाटेत अनेकदा अनेक टोलनाके असतात. रस्त्यांच्या मधोमध येणाऱ्या या टोलनाक्यांवर आम्हाला टोल टॅक्स भरावा लागतो. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना टोल प्लाझावर टोल टॅक्स भरणे आवश्यक आहे. टोल टॅक्स वसूल करून सरकार राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात झालेल्या खर्चाची भरपाई करते. याशिवाय राष्ट्रीय महामार्गांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्चही टोल टॅक्समधून केला जातो. याचाच भाग म्हणून नवीन योजना जाहीर करण्यात आली असून १५ ऑगस्ट २०२५ पासून ३०००  रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू केला जात आहे. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० प्रवासांपर्यंत (जे आधी होईल ते) वैध असेल. हा पास विशेषत: गैर व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन इ.) डिझाइन केला आहे आणि देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर अखंड प्रवास करण्यासाठी सक्षम असेल. पथकराच्या नियमामध्ये काही बदल झाल्यावर आता दुचाकी वाहनांवरही कर लागणार अशा बातम्या काही प्रसारमाध्यमांमधून येत आहेत. यावर गडकरींनी नाराजी व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमके काय म्हणाले गडकरी?

गडकरी म्हणाले की, काही प्रसार माध्यमांमधून दुचाकी वाहनांवर पथकर लावण्यात येणार असल्याच्या खोट्या बातम्या चालवल्या जात आहेत. असा कुठलाही निर्णय प्रस्तावित नाही. दुचाकी वाहनांना पथकरापासून पूर्णपणे मुक्ती आहे. त्यांना कुठलाही कर लागणार नाही. कुठल्याही प्रकारची माहिती नसताना अशा खोट्या बातम्या बसरवणे चुकीचे असल्यचेही गडकरी म्हणाले. खरी माहिती नसताना अशा बातम्या पसरवणे हे चांगल्या पत्रकारितेचे लक्षण नाही. याबाबत गडकरींनी खेदही व्यक्त केला.