वर्धा : इतर सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे पोलीसांच्या पण व्यक्तिगत तक्रारी असतात का हो, अशी शंका पडलीही असेल तर ती कोणी गांभीर्याने घेतली पण नसेल.पण जावे त्यांच्या वंशा ,तेव्हा कळे असे दिसून आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी अभिनव कल्पना अमलात आणली आहे.जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांचा जनता दरबार भरविला.हा इ-दरबार स्टाफच्या अडचणी, तक्रारी,सूचना जाणून घेण्यासाठी भरला.त्यास मिळालेला प्रतिसाद थक्क करणारा ठरला.
काहींनी मंत्रालयीन कर्मचारी, वरिष्ठ यांच्याकडून होत असलेल्या दिरंगाई बद्दल नाराजी नोंदविली.प्रामुख्याने मेडिकल बिल, रखडलेली पदोन्नती व वेतनवाढ, पोलीस वसाहतीतील सुविधा, कौटुंबिक अडचणी असे मुद्दे निर्भिडपणे दरबारात मांडले.त्याची दखल घेत अधीक्षक हसन यांनी संबंधित मंत्रालयीन कर्मचारी,पोलीस अधिकारी यांना सूचना करीत समस्या निरसन केले.तसेच काही तक्रारीबाबत वरिष्ठ पातळीवर तत्परतेने पाठपुरावा करीत निरसन करण्याची ग्वाही अधीक्षक हसन यांनी दिल्याचे निवासी पोलीस उपअधीक्षक कळवितात.मिळालेला प्रतिसाद पाहून दर महिन्यात अशी सुनावणी घेण्याची ग्वाही देण्यात आली आहे.