नागपूर : रेल्वे मंडळाने (बोर्ड) विविध स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी स्थापन इंडियन स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (आयआरएसडीसी) गुंडाळण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असून पुनर्विकासाची कामे झोनल स्तरावर देण्यात आली आहे. त्याचा परिणाम मुंबई, (सीएसटीएम) आणि नागपूरसह देशभरातील स्थानकांचा पुनर्विकास रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे बोर्डाने नवीन धोरणानुसार आयआरएसडीसी बंद करून ते रेल्वे लँड डेव्हलपमेंट ऑथिरिटी (आरएलडीए)मध्ये विलीन करण्यात आले आहे.

देशातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी हे महामंडळ स्थापन करण्यात आले होते. आरआरएसडीसी देशभरातील ६०० स्थानके विकसित करणार होते.

रेल्वेस्थानक पुनर्विकासाची कामे संबंधित झोनला (मध्य रेल्वे, दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे इत्यादी) हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वे बोर्डाच्या निर्णयानंतर मुंबई (सीएसएमटी) आणि नागपूर स्थानकाच्या पुनर्विकासाची जबाबदारी मध्य रेल्वेकडे हस्तांतरित केली जात आहे. याबाबत आयआरएसडीसीचे महाव्यवस्थापक अश्विनी कुमार यांनी माहिती नसल्याचे सांगितले.

झेडआरयूसीसीचे माजी सदस्य बसंतकुमार शुक्ला यांनी झोन स्तरावर पुनर्विकासाचे काम मुदतीत होऊ शकत नसल्याने या कामासाठी आयआरएसडीसी स्थापना करण्यात आली. झोनच्या काही मर्यादा आहेत. त्यांनी मोठे प्रकल्प वेळेत पूर्ण केल्याचा इतिहास नाही. यामुळे प्रकल्प रखडतात आणि प्रकल्पाची किंमतही वाढत जाते, असा अनुभव आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले, रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाची पुढील कामे आरएलडीए आणि झोनल रेल्वे करणार आहे.