अमरावती : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मोर्शी येथील एका कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हटल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महसूल मंत्र्याच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मिरच्या देखील जाळल्या.

शेतकऱ्यांच्या वेदनेला ‘नौटंकी’ म्हणणं म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांच्या भावनांचा अनादर करणे आहे, हे सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवत असल्याचे बावनकुळे वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. राजकारण्यांनी जर या वेदनेचा अपमान केला, तर त्या अपमानाचे उत्तर जनतेच्या रोषातून मिळेल. जो शेतकऱ्याचा अपमान करेल, तो जनतेच्या रोषाला सामोरे जाईल, असा इशारा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोर्शी येथे बोलताना काही लोक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नौटंकी करीत आहेत, असे वक्तव्य केले होते. त्यांनी थेट माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव घेतले नाही, पण प्रहारच्या कार्यकर्त्यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला.

शेतकऱ्यांचा प्रश्न सर्वसामान्य लोकांचा प्रश्न आहे, पण भाजप सरकारने तो ‘नौटंकी’ आणि टिंगल टवाळी म्हणून दडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. निवडणुकीपूर्वी “सातबारा कोरा,कोरा, कोरा” म्हणणारे आज शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची तारीख विचारली की त्यांना मिरची झोंबते, आणि त्यांच्या आंदोलनाला अपमानित केल्या जाते, असे प्रहारच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. 

प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोड़े मारो आंदोलन केले आणि मिरच्या जाळल्या. या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्यांचा संताप व्यक्त झाला असून खिल्ली उडवणारे आणि फसवणूक करणाऱ्यांचा निषेध करण्यात आला. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन आता जिल्हानिहाय आणि अधिक तीव्र होत आहे. ही लढाई फक्त कर्जमाफीची नाही, ती शेतकऱ्याच्या अस्मितेची लढाई आहे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

या आंदोलनाच्या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जितू दुधाने, महानगर प्रमुख बंटी रामटेके, प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे, संपर्क प्रमुख गोलू पाटील, अकबर भाई, अर्जुन अवशिकर, मनीष पवार, राजू परिसे, समर्थ डावरे, आणि महिला नेत्या मंजुषा बोडखे, अलका शहाणे, शुभांगी वाटाणे, पद्मा मेतकर, ललिता धूर्वे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना खोट्या आश्वासनांनी फसवणे थांबवा.“सातबारा कोरा कोरा कोरा” या घोषणेचा विसर पडलेल्या बावनकुळे यांना जबाबदार ठरवून मंत्रिमंडळातून हटवा, कर्जमाफी आणि हमीभावावर तात्काळ आणि स्पष्ट तारीख जाहीर करा, अशी मागणी प्रहाच्या कार्यकर्त्यांनी केली.