यवतमाळ : समाजातील वाढती गुन्हेगारी, मानसिक अस्वस्थता, व्यसनाधीनता, कौटुंबिक कलह आणि अल्पवयीनांमधील भावनिक अडचणी या समस्यांचा सर्वंकष वेध घेण्यासाठी यवतमाळ शहरात ‘मंथन’ या सायकॉलॉजिकल असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमामागे समाजशास्त्रज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, समाजसेवक, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, पत्रकार, शिक्षक, पालक आणि मानसशास्त्र व समाजकार्य शाखेचे विद्यार्थी एकत्र आले असून समाजातील मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

शहरातील सामाजिक संघटनांचे समन्वयक प्रा.घनश्याम दरणे तसेच मानसोपचार तज्ज्ञ डॉ.श्रीकांत मेश्राम यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस किंवा प्रशासनासोबत समाजाचा एक सुजाण नागरिक म्हणून आपलीसुद्धा आहे. ‘मंथन’ने यासाठीच पुढाकार घेत सामाजिक स्वास्थ टिकविण्याचा निर्धार केला आहे. यातून प्रामुख्याने समाजविघातक वर्तन तसेच व्यसनाधीनतेवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची मते विचारात घेतली जाणार आहे. सोबतच सजग पालकत्व, अल्पवयीनांच्या भावनिक समस्या, कौटुंबिक कलह, करिअर तसेच जोडीदार निवडण्यामागे असलेला गोंधळ दूर करून त्या सर्व मानसशास्त्रीय पैलूंचा चर्चासत्रातून उलगडा होणार आहे.

समाजामध्ये वाढलेली गुन्हेगारी, घटस्फोट, कौटुंबिक छळाच्या घटना तसेच व्यसनाधीनतेवर अंकुश बसविण्यासाठी ही मंडळी एकदिलाने काम करणार आहेत. ‘भावनिक साक्षरता’ ही नवी संकल्पना समाजात रुजविण्यासाठी याद्वारे प्रयत्न केले जाणार आहे. सततच्या रक्तरंजित घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘आक्रमक वर्तनामागची मनोबैठक’ हा चर्चासत्राचा पहिला विषय राहणार आहे, असे प्रा. घनश्याम दरणे यांनी सांगितले.

भावनिक सजगता चळवळीचा मुख्य उद्देश

वाढती गुन्हेगारी, आत्महत्येच्या घटना, विभक्त कुटुंबातील दुरावा, घटस्फोटाचे वाढते प्रमाण, व्यसनाधीनता, बालक -पालक संबंधातील दरी, अल्पवयीनांचा गुन्हेगारीत होणारा शिरकाव, सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्यांचे नवे प्रश्न, स्मार्टफोन व्यसनाधीनता, मानसिक तसेच भावनिक आजारांचे वाढते प्रमाण, कुमारी माता, सायबर फसवेगिरी यासारखे प्रश्न व त्यावरील उपाय या माध्यमातून शोधले जाणार आहे. लोकांमध्ये भावनिक सजगता यावी, हा या चळवळीचा मुख्य उद्देश असणार आहे. मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर ‘मंथन’च्या माध्यमातून जनजागृती करून उपाय शोधले जाणार असल्याचे समन्वयक प्रा. घनश्याम दरणे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजासाठी विधायक अशी पिढी घडविणे हा ‘मंथन’ या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. राग, क्रोध, द्वेष, मत्सर, लोभ या वाईट भावनांच्या जागी आनंद, कृतज्ञता, प्रेम आणि समाधानासारख्या भावनांना मानवी आयुष्यात स्थान देण्याचा प्रयत्न या चळवळीतून केला जाणार आहे. लोकांमध्ये भावनिक साक्षरतेविषयी जनजागृती होऊन त्यांचे आयुष्य सुसह्य कसे करता येईल, यावर भर राहणार असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांनी सांगितले.