नागपूर : हवामान खात्याने गेल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला होता. या आठवड्याच्या सुरुवातीलाच पावसाळी वातावरण निवळले असून किमान तापमानासह कमाल तापमानातही झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे आता थंडीचा कडाका वाढणार हे निश्चित! हवामान खात्यानेही तसा अंदाज व्यक्त केला आहे.

राज्यातील पावसाचे सावट आता दूर झाले आहे. काही भागातून तापमानात वेगाने घसरण सुरू झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात गेल्या आठवड्यापासूनच किमान तापमानात वेगाने घसरणीला सुरुवात झाली आहे. मधले दोन दिवस वगळता आता पुन्हा किमान तापमानासह कमाल तापमानात देखील घट होत आहे.

हेही वाचा – VIDEO : खासदार प्रतिभा धानोरकरांचा धमकीवजा इशारा! ‘व्हायरल व्हिडीओ’ने खळबळ

महाराष्ट्रासह दक्षिण भारतात गेले काही दिवस पावसाचे सावट होते. मात्र, आता पावसासाठी असणारी स्थिती निवळली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा थंडी पाय घट्ट रोवू लागली आहे. राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात धुक्याचे प्रमाण वाढत आहे. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढत आहे. किमान तापमान देखील वेगाने घसरत आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात गारठा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून, ही थंडी टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्य व्यापताना दिसेल. विदर्भात गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील किमान तापमान १३.२ व १३.५ अंश सेल्सिअस इतके कमी झाले. तर वर्धा, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर गोंदियात २९.२ व बुलढाण्यात ते २९.६ अंश सेल्सिअस इतके होते. नागपूर शहरात देखील ३०.८ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद घेण्यात आली.

हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : हजारो कर्मचारी निघाले मतदान केंद्रांकडे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके कमी झाले आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही पहाटेच्या वेळी आणि रात्री उशिरा हवेत गारवा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. शीतलहरींनी खऱ्या अर्थाने परिणाम दाखवण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, थंडी सुरू झाल्यानंतर श्वसनविकारातही वाढ होते. यंदा दिवाळीत फटाक्यांच्या प्रदूषणामुळे हवेची पातळी आधीच खालावली आहे. त्यात आता थंडीमुळे देखील श्वसनविकाराचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे आरोग्यावर होणारे दीर्घकालीन परिणाम पाहता नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.