अमरावती : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी महायुतीचे सरकार सकारात्मक असून यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत केली जाणार आहे. या समितीच्या अहवालानंतर शेतकऱ्यांचे वर्गीकरण करून कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, सोबतच दिव्यांगांना मानधन वाढवून देण्यासंदर्भात येत्या ३० जून पासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात पूरवणी मागण्यांमध्ये निधीची तरतूद केली जाणार आह, यासह एकूण १७ मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूकूंज मोझरी येथे बोलताना दिले.
शेतकरी, शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे गेल्या ८ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. दरम्यान, आज आंदोलनाच्या सहाव्या दिवशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांनी उपोषणस्थळी भेट देऊन बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली. कडू यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती करण्यासाठी आपण आलो आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: कडू यांच्याशी चर्चा केली आहे. एकूण १७ मागण्या बच्चू कडू यांनी केल्या आहेत. विविध खात्यांशी संबंधित मंत्र्यांसोबत कडू यांनी चर्चा केली आहे. लवकरच यासंदर्भात शासन निर्णय काढून मागण्या पूर्ण केल्या जातील.
दिव्यांगांच्या मानधन वाढीचा विषय हा आर्थिक बाबींशी निगडीत आहे. त्याची तरतूद अर्थसंकल्पात करावी लागणार आहे, त्यामुळे येत्या अधिवेशनात यावर निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत केली जाणार आहे. ही समिती शेतकऱ्यांचे जमीन धारणेनुसार वर्गीकरण करून कर्जमाफी देण्याविषयी अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर याचा निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. देशात काल फार मोठी विमान दुर्घटना घडली. राष्ट्रीय शोक व्यक्त केला जात असताना आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती असल्याचे बावनकुळे म्हणाले.
कडूंनी बावनकुळे यांनी मांडलेल्या भूमिकेचे स्वागत केले, पण आंदोलन मागे घेण्याचा निर्णय तत्काळ घेतला जाणार नाही. उद्या शनिवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आंदोलन पुढे न्यायचे की स्थगित करायचे, याविषयी निर्णय घेतला जाईल, असे कडू यांनी स्पष्ट केले. सध्या सरकारसोबत चर्चा सुरू आहे, त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याने पुढील निर्णय होईपर्यंत आंदोलन करू नये, अशी सूचना कडू यांनी केली.