सुमित पाकलवार, लोकसत्ता

गडचिरोली: तेलंगणातील रेशनिंगचा तांदूळ अवैधपणे महाराष्ट्रात तस्करी करून आर्थिक दृष्ट्या गब्बर झालेल्या तांदूळ माफियांची दक्षिण गडचिरोली भागात चांगलीच दहशत आहे. ‘लोकसत्ता’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच त्या भागातील नागरिकांनी संपर्क करून नाव न छापण्याच्या अटीवर ही धक्कादायक माहिती दिली. त्यामुळे डोळ्यादेखत गैरप्रकार सुरू असताना ‘वीरप्पन’ याच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी देखील धजावत नसल्याचे चित्र आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याला तेलंगणा आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे हा तालुका आंतरराज्यीय तस्करीचे केंद्र ठरत आहे. भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेत तेलंगणातील करीमनगर येथून या भागात पाच वर्षांपूर्वी तांदूळ माफियांनी पाय पसरायला सुरुवात केली. त्यांनतर प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा अवैध धंदा वाढविला. आसरल्ली मार्गावर तस्कर ‘वीरप्पन’ याने वनविभागाच्या जागेवर बळजबरी ताबा मिळवून गोदाम उभे केले. गोदाम परिसरात ‘सीसीटिव्ही’च्या माध्यमातून देखरेख ठेवली जाते. कुणीही या भागात गेल्यास त्याला ‘वीरप्पन’ची गुंड धमकी, दमदाटी करतात.

हेही वाचा… अवैध खनिज उत्खनन व वाहतूकबाबत जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन’ मोडवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी काही माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या परिसरात तांदूळ माफियांची दहशत पाहायला मिळते. एवढेच नव्हे तर प्रशासनातील अधिकारी देखील कारवाई करण्यास घाबरतात, तर काही तस्करांची साथ देतात. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका व्यक्तीचे तस्करांशी साटेलोटे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून ‘वीरप्पन’ आणि त्यांच्या साथीदारांनी कोट्यावधींची माया जमवली आहे. या जोरावर ते आज पूर्व विदर्भात दररोज अवैधपणे शेकडो टन तांदूळ पुरवठा करतात. यांच्या दादागिरीमुळे कुणीही स्थानिक तक्रार द्यायला पुढे येत नाही. परंतु या परिसरातील ‘सीसीटिव्ही’ ताब्यात घेऊन चौकशी केल्यास सर्व सत्य बाहेर येईल असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.