लोकसत्ता टीम

अकोला : काँग्रेसचे सरकार येताच ते राज्य शाही परिवाराचे एटीएम होऊन जाते. हिमाचल, तेलंगणा, कर्नाटक राज्य शाही परिवाराचे एटीएम झाले. महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी कर्नाटक, तेलंगणामध्ये वसुली सुरू झाली. मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केला.

अकोल्यातील कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार अनुप धोत्रे, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, उमेदवार रणधीर सावरकर, डॉ. संजय कुटे, विजय अग्रवाल, हरीश पिंपळे, प्रकाश भारसाकळे, बळीराम सिरस्कार यांच्यासह पश्चिम वऱ्हाडातील महायुतीचे उमेदवार व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह नामोल्लेख टाळून गांधी परिवारावर देखील जोरदार निशाणा साधला.

आणखी वाचा-नक्षलवादी संविधानाला मानत नाही; भाजपलाही संविधान संपवायचे आहे – छत्तीसगड माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल

पुढे नरेंद्र मोदी म्हणाले, ९ नोव्हेंबरची ऐतिहासिक तारीख. आजच्या दिवशी राम मंदिर प्रकरणात न्यायालयाचा निर्णय आला होता. त्यावेळेस संपूर्ण देशातील सर्व धर्मीयांनी एकोप्याचे दर्शन घडवले होते. २०१४ पासून महाराष्ट्रातील जनतेने भाजपाला आशीर्वाद दिले. ही महाराष्ट्रातील जनतेची देशभक्ती, दूरदृष्टी व राजकीय समज आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक प्रकल्प मंजूर केले. महाराष्ट्रातील बंदरासाठी ८० हजार कोटीची तरतूद केली. देशात गरिबांसाठी चार करोड पक्के घर बनवून दिले. आता आणखी तीन करोड नवीन घर बनवण्याची सुरुवात केली. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा देण्याचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. त्याची पूर्ती आता सुरू झाली आहे.

काँग्रेस आघाडी सरकारने गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू दिला नव्हता. तो केंद्र सरकारने मिळवून दिला. महाविकास आघाडीचे घोटाळा पत्र देखील आले. महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचार, हजारो कोटींचे घोटाळे आहेत. बदली करण्याचा त्यांचा धंदा सुरू होतो. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काँग्रेसचे अनेक वर्ष सरकार राहून देखील पाणी समस्या कायम होती. जाती-जातीमध्ये वाद निर्माण करून देशावर राज्य करण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

आणखी वाचा-देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”

काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला. निवडणुकीमध्ये त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी पुज्यनीय आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सदैव स्मरणात रहावे, असे कार्य केंद्र सरकारने आता केले, असे मोदी म्हणाले. प्रास्ताविक खासदार अनुप धोत्रे यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संविधान घेऊन फिरणारे ढोंगी

काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचे संविधान पुन्हा काश्मीर बाहेर जाईल. मात्र, ते होऊ देणार नाही. संविधान घेऊन फिरणारे ढोंगी आहेत. त्यांनी ७५ काश्मीरमध्ये संविधान लागू होऊ दिले नाही, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.