नागपूर : ‘समृद्धी’ महामार्ग हा राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार, असा दावा शासनाकडून करण्यात येत आहे. त्याचे उत्तर भविष्यात मिळेलही. परंतु, अठरा दिवसांत या महामार्गावर दोन अपघातात नागपूरच्या चौघांचा मृत्यू झाला आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

२८ डिसेंबरला वाशीमजवळ झालेल्या अपघातात नागपूरकर माय-लेकींचा मृत्यू झाला. सोमवारी बुलढाणा जिल्ह्यानजीक झालेल्या अपघातात नागपूरच्या दोघांचा मृत्यू झाला. ते अवधूत नगरचे रहिवासी असून त्यांची नावे गौरव खरसान, अंकित खैरकर अशी आहेत. त्यामुळे नागपूरकरांसाठी हा महामार्ग जीवावर उठलेला दिसत आहे. यापूर्वी २८ डिसेंबरला झालेल्या अपघातात नागपूरकर जोशी कुटुंबातील आई-आणि मुलीला प्राण गमवावे लागले होते.

हेही वाचा >>> नागपूर : गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात मादी बिबटं मृतावस्थेत

नागपूरचे रहिवासी ॲड. अजय जोशी हे कुटुंबासह तुळजापूर येथून देवदर्शन करून नागपूरकडे परत येत असताना कारंजा तालुक्यातील दोणंद गावाजवळील ‘समृद्धी’ महामार्गावर त्यांच्या गाडीसमोर अचानक रोही आडवा झाला. त्यामुळे झालेल्या अपघातात अजय जोशी आणि त्यांची १० वर्षांची मुलगी जखमी झाले होते. तर त्यांची पत्नी अदिती आणि ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. सोमवारीही बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या ‘समृद्धी’ महामार्गावर अपघात घडला.

हेही वाचा >>> नागपूर : नायलॉन मांजाने छाटले एकाच दिवशी दहा पक्ष्यांचे पंख

‘समृद्धी’ महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला लोकार्पण झाले. त्यानंतर काही तासानंतरच या महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली. दोन कार एकमेकांवर धडकल्या. त्यानंतर कधी वन्यप्राणी रस्त्यावर येऊन, तर कधी वाहनांचे टायर फुटल्याने तर वाहने ‘डिव्हायडर’वर आदळून अपघात होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिवहन विभागाच्या बैठकीनंतरही अपघातांची मालिका

अठरा दिवसांपूर्वी जोशी कुटुंबाला अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाल्यावर नागपुरात परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय बैठक झाली होती. त्यात ‘एमएसआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालकांसह परिवहन खात्याशी संबंधित नागपूर-शिर्डी दरम्यानचे सगळे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी महामार्गावर ८७ किलोमीटर पाहणी केली होती. त्यानंतर निर्धारित गतीपेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. चालकांचे समुपदेशन केले. परंतु, त्यानंतरही अपघातांचे सत्र काही थांबलेले नाही.